नवी दिल्ली -देशात विरोधकांच्या इंडिया आघाडीला अनुकूल अंडरकरंट आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इंडियाचा विजय होईल, असा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी केला.देशाची राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यात मतदान झाले. प्रियंका यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
महागाई आणि बेरोजगारी हे देशातील सर्वांत मोठे मुद्दे आहेत. मात्र, ते मुख्य मुद्दे सोडून भाजपचे नेते इतर विषयांवरच बोलत आहेत. त्यामुळे जनता विटली आहे. आम्हाला भेडसावणाऱ्या चिंतांकडे लक्ष दिले जात नसल्याची भावना जनतेमध्ये आहे. कॉंग्रेस सुरूवातीपासून जनतेशी निगडीत मुद्द्यांवर बोलत आहे. त्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही प्रचार केला. पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्या मुद्द्यांचा समावेश आहे, असे त्या म्हणाल्या.
इंडिया आघाडीचे घटक म्हणून कॉंग्रेस आणि आपने दिल्लीत हातमिळवणी केली. त्यांच्यातील समझोत्यानुसार दिल्लीतील लोकसभेच्या एकूण ७ जागांपैकी आप ४, तर कॉंग्रेस ३ जागा लढवत आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांना आपच्या उमेदवारांना, तर आपच्या नेत्यांना कॉंग्रेस उमेदवारांना मत द्यावे लागल्याचे चित्र काही मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळाले.
त्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी प्रियंका यांना विचारला. त्यावर त्या उत्तरल्या, मतभेद बाजूला ठेऊन आम्ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मतदान करत आहोत. त्याचा मला अभिमान वाटतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.