मुंबई – राज्याच्या काही भागात अवकाळी पावसामुळे दिलासा मिळत असला तरी राज्यभरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून आजच्या घडीला 25 जिल्ह्यातील 2 हजार 973 गावे आणि 7 हजार 671 वाडयांना 3 हजार 692 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.
यापैकी सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहेत. दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा असताना धरणातील उपयुक्त पाणीसाठा आटला आहे. राज्यातील सर्व धरणात मिळून आज 23 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी हाच पाणीसाठी 39 टक्के इतका होता.
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच पाणीटंचाई आणि दुष्काळाची तीव्रता समोर आली आहे. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने मंत्रालयात दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय घेतला.
चारा छावण्या सुरू करण्यास किती निधी लागेल याचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने चारा छावण्या सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय मदत आणि पुनर्वसन विभागाच्या स्थायी आदेशानुसार दुष्काळी भागात दुष्काळ निवारण उपाययोजना सुरू केल्या जाणार आहेत. त्यानुसार पीककर्जाचे पुनर्गठन, कृषी वीज बिल, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्कात सवलती लागू केल्या जाणार आहेत.
सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ साडेनऊ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. लवकर पाऊस पडला नाहीतर पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होईल. मराठवाड्यात 1289 गावे, 512 वाड्यांमध्ये 1 हजार 837 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच 3 हजार 181 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील पाणी टंचाईची स्थितीही बिकट झाली आहे. पाऊस लांबला तर राज्यातील पाणी टंचाईचे संकट आणखी गहिरे होण्याची भीती असून त्यामुळे टँकर्सची संख्या वाढू शकते. महाराष्ट्रातील सर्व धरणात मिळून फक्त 23.63 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
गेल्यावर्षी याचवेळी 33.59 टक्के पाणीसाठा होता. मराठवाड्यात सर्वात कमी 9.55 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागात 25.74 टक्के, पुणे विभागात 17.59 टक्के, नागपूर विभागात 38.83 टक्के तर अमरावती विभागात 39.94 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यातील धरणातील उपयुक्त पाणीसाठा / विभाग आजची स्थिती गतवर्षीच्या स्थिती
नागपूर ३८.८३ टक्के ४२.५८ टक्के
अमरावती ३९.९४ टक्के ४९.२५ टक्के
छ. संभाजीनगर ९.५५ टक्के ३८.९५ टक्के
नाशिक २५.७४ टक्के ४१.७९ टक्के
पुणे १७.५९ टक्के १९. ८३ टक्के
कोकण ३७.११ टक्के ३९.२६ टक्के
विभागनिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या
विभाग गावे वाड्या
कोकण २३२ ७६६
नाशिक ७५६ २५७०
पुणे ६३१ ३८२९
छ. संभाजीनगर १२५६ ५०६
विभागनिहाय टँकर्स संख्या
विभाग टँकर्स
कोकण १७७
नाशिक ८१२
पुणे ७५५
छ. संभाजीनगर १८४९
अमरावती ९२
नागपूर ०७
(एकूण ३६९२)