धाराशिव – राज्यात जवळपास १० लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे, तर तब्बल १६ लाख हेक्टरवर पीक विमा काढला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर विमा काढण्यात आल्याने काही जिल्ह्यांत हेराफेरी झाल्याचा संशय आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर विमा उतरवल्याचे समोर आले आहे.
लहरी हवामान व अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओल नसल्याने खत, बियाणे अन् मशागतीचा खर्च मातीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणीच केली नाही. मात्र, एका रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांत पेरणी न करताच विमा उतरवल्याचे वास्तव समोर आले आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पेरणी क्षेत्रापेक्षा दुप्पट क्षेत्रावरचा पीक विमा उतरवला असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. १५ डिसेंबरनंतर याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पीक विम्यात तीनपट वाढ
पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. २०२२ मध्ये रब्बी हंगामात राज्यातील केवळ ७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यंदा ३० नोव्हेंबरपर्यंतच २३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे.
एकूण ६९३ कोटी प्रीमियम जमा
३० नोव्हेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयात २३ लाख ४२ हजार २०९ रुपयांचा पीक विमा प्रीमियम भरला आहे त्याप्रमाणे राज्य सरकारने ४०१ कोटी तर केंद्राने २९२ कोटी ४३ लाख असा एकूण ६९३ कोटी ६६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.