पिंपरी – मुंबईकडे दूध घेऊन निघालेल्या टॅंकरचालकाला अडवून चौघांनी चाकूने मारहाण करुन जखमी केले. ही घटना 30 मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर सुतारवाडी पुलाच्यापुढे सूस येथे घडली. पंचलाल श्रीलल्लु पाल (रा. किकवीगाव ता. भोर) असे जखमी टॅंकर चालकाचे नाव आहे. त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोखळी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टॅंकरचालक हे एशिया दुग्ध उद्योग कंपनीचे टॅंकर (क्र. एमएच 12/एफजी/ 0843) घेवून मुंबईकडे निघाले होते. यावेळी ते सुतारवाडी पुलाच्या पुढे आल्यानंतर दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्यांना टॅंकर थांबवण्यास सांगितले. टॅंकर थांबविल्यानंतर चौघांनी कॅबिनमध्ये येवून पंचलाल यांना पैशाची मागणी करीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.