-अमित डोंगरे
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत काही गोष्टी सातत्याने खटकत आहेत. स्ट्रॅटेजीक टाइम, राखीव खेळाडूबाबतचे नियम तर अनाकलनीय आहेतच. मात्र, आता अत्यंत दर्जाहीन पंचगिरीचादेखील सर्वच संघांना फटका बसताना दिसून येत आहे.
या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनच यातील सामन्यांसाठी घोषित केलेल्या 12 भारतीय पंच तसेच 3 परदेशी पंचांबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात नितीन मेनन यांनी पंजाबच्या एका फलंदाजाने काढलेली दुहेरी धाव वादग्रस्त पद्धतीने शॉर्टरन ठरवली व तेथूनच सुमार पंचगिरीची चर्चा सुरू झाली.
पंजाबचे मयंक आग्रवाल व ख्रिस जॉर्डन यांनी दोन धावा घेताना जॉर्डनने त्याची बॅट क्रीझला टेकवली नसल्याचे समजून ही धाव शॉर्टरन घोषित केली. त्यांनी जर तिसऱ्या पंचांची मदत घेतली असती तर ही धाव योग्य असल्याचे सिद्ध झाले असते व पूर्ण वेळेतच हा सामना पंजाबने जिंकला असता. मात्र, पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला व दिल्लीने पंजाबचा पराभव केला.
मेनन यांची या स्पर्धेसाठी पंच म्हणून या स्पर्धेत नियुक्ती झाली त्यावेळीही त्यांच्या अनुभवावरून टीका झाली होती. मेनन यांच्यासह अनिल चौधरी, एम. शमसुद्दीन, विनीत कुलकर्णी व एस. रवी हे पंच वगळता अन्य एकाही पंचांला अनुभव नाही. करोनाचा धोका असल्यामुळे आयसीसी पॅनलवरील अन्य पंचांना या स्पर्धेसाठी बोलावण्यात न आल्याने पंच पथकात 12 पंच भारतीय आहेत. न्यूझीलंडचे ख्रिस ग्रेफनी, ऑस्ट्रेलियाचे पॉल रॉयफेल व इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे केवळ तीनच पंच परदेशी आहेत.
आयसीसीच्या अन्य पंचांनी करोनाच्या धोक्यामुळे या स्पर्धेसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितल्यामुळे भारताच्या पंचांना या स्पर्धेत नियुक्त करण्यात आले. खरेतर ही त्यांच्यासाठी आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी अत्यंत नामी संधी मिळाली होती. वीरेंद्र शर्मा, केएन अनंत पद्मनाभन, यशवंत बोर्डे, उल्हास गंधे, के. श्रीनिवासन, अनिल दांडेकर व पश्चिम पाठक यांची पंच पथकात वर्णी लागली असली तरीही त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा फारसा अनुभव नाही. तसेच त्यांना देशांतर्गत स्पर्धांमध्येही गेल्या दोन वर्षांत फारसे नियुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेफ्री पथकात तर सर्वच जण भारतीय आहेत. त्यात माजी कसोटीपटू जवागल श्रीनाथ, मनू नय्यर, व्ही. नारायण कुट्टी, शक्ती सिंग व प्रकाश भट्ट यांचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेतील काही सामन्यांत पायचीतचे, यष्टीमागच्या झेलबादचे, रनिंग बिटविन द विकेटचे तसेच एरियल कॅमेऱ्याला चेंडू लागून घेतल्या गेलेल्या झेलांबाबतचे पंचांचे काही निर्णय संभ्रमात टाकणारे ठरले आहेत. अर्थात, या स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहात असलेल्या अनेकांनी सोशल मीडियावरही पंचगिरीच्या दर्जाबाबत टीका केली आहे. मात्र, त्यावर आयपीएल समिती, स्पर्धेतील संघांचे कर्णधार तसेच बीसीसीआयने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु पुढील एक महिना ही स्पर्धा सुरू राहणार असल्याने पंचगिरीच्या दर्जातही सुधारणा व्हावी अशीही अपेक्षा करण्यात येत आहे.
मेनन यांच्या वादग्रस्त निर्णयाप्रमाणे अनेक निर्णय संशयाच्या गर्तेत सापडू नयेत अशीही अपेक्षा केली जात आहे. जर तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध आहे तसेच तिसरे पंचही मैदानावरील पंचांना सु-मोटो मदत करू शकतात तर मग मैदानावरील पंच आपला हटवादीपणा का दाखवतात हाही एक प्रश्न उरतो.
देशाचे माजी आंतरराष्ट्रीय पंच माधव गोठोस्कर यांच्या द बर्निंग फिंगर या पुस्तकात त्यांनी पंचांच्या दर्जाबद्दल लिहिले आहे. पंचाचे निर्णय जाहीर करणारे बोट एकाद्या संघावर अन्याय करणारे ठरू नये. पंच हा निष्पक्ष असावा व त्याच्याकडून कोणत्याही संघाला तसेच खेळाडूला सॉफ्टकॉर्नर मिळू नये, अशी अपेक्षा गोठोस्करांनी व्यक्त केली होती.
त्याच धर्तीवर आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत तरी पंचगिरीचा दर्जा उंचावलेला दिसावा हीच काय ती अपेक्षा आहे. आधुनिकतेची कास धरलेल्या सध्याच्या क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाने प्रचंड क्रांती केली आहे, मग त्याचा पुरेपूर वापर पंचांनी करावा. आपली निर्णय क्षमता कितीही नावाजलेली असली तरीही चूक होऊ शकते. अम्पायर इज ए सोल जज, असे म्हटेल जात असले तरीही जर तंत्रज्ञानाच्या मदतीने मैदानावरील पंचांची निर्णय क्षमता किमान 90 टक्के अचूक होत असेल व निर्णय अत्यंत योग्य दिले जात असतील तर, त्याचा वापर करायला काय हरकत आहे.