– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेत गेल्या वर्षीपर्यंत एक खेळाडू आपले नाणे खणखणीत वाजवत होता. अचानक तो कुठेतरी गायब झाला. आता यंदाच्या मोसमात दमदार शतक फटकावून त्याने पुन्हा एकदा आपण परतल्याचे बिगूल वाजवले. व्यंकटेश अय्यर हे याच खेळाडूचे नाव. यंदाच्या स्पर्धेत त्याने शतकी खेळी केली व काठावर पास झाला आता त्याच्यासमोर उर्वरित लढती आहेत व त्यात जर त्याने सातत्य राखले तर त्याचे भारतीय संघातील गेलेले स्थान परत मिळण्याची शक्यता बळावेल.
कोलकाता नाईट रायडर्सचा हा नवोदित नसला तरीही काहीसा अननुभवी फलंदाज गणला जात होता. त्याने गेल्या दोन मोसमात सातत्याने धावा केल्या. त्यामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. मात्र, त्या स्तरावर त्याला कामगिरी सिद्ध करता आली नाही व संघातील स्थान गमवावे लागले. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्याने आपण भरात असल्याचे दाखवून देताना आपली कारकीर्द वाचवली, असे म्हणायला हरकत नाही.
त्याने एकेक फलंदाज बाद होत असताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात शतक साकार केले ते देखील एकहाती. त्याने 2021 साली भारतीय संघाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पुढील वर्षी त्याला भारताच्या एकदिवसीय संघातही पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, केवळ 2 सामने खेळताना त्याच्या नावावर 24 धावाच जमा झाल्या व निवड समितीची दृष्टी वक्र झाली.
व्यंकटेश केवळ फलंदाज नव्हे तर अष्टपैलूही आहे. मात्र, भारताकडून त्याला एकही बळी मिळवता आला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 सामने खेळण्याची संधी मिळूनही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्याच्या नावावर 133 धावा तर 5 बळी अशी कामगिरी आहे. सध्याचा टी-20 संघाचा कर्णधार व आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या उपलब्ध नसेल तर व्यंकटेश हा सर्वोत्तम पर्याय मानला जात होता. मात्र, त्याची कामगिरी सुमार तर होतीच; परंतु त्याच्यात कामगिरी उंचावण्याची जिद्दही तेव्हा दिसली नव्हती.
आयपीएलमध्ये 27 सामन्यांतून जवळपास 800 धावा असलेला हा खेळाडू आता यंदाच्या मोसमात परत एकदा भरात येताना दिसत असून यावेळी त्याने सातत्य दाखवले तर त्याला पुन्हा एकदा निवड समितीला प्रभावीत करण्याची व भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. भारताच्या टी-20 संघातून गेल्या काही महिन्यांत असे चित्र दिसले आहे की विराट कोहली, रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जात आहे, अशा स्थितीत चमक दाखवली तर व्यंकटेशचे पुनरागमनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.