– अमित डोंगरे
एखाद्या खेळाडूची गुणवत्ता कशी सिद्ध होते तर त्या खेळाडूला सातत्याने संधी मिळते, पण जर संधीच मिळाली नाही तर तो त्याची गुणवत्ता कोणत्या व्यासपीठावर सिद्ध करणार. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) सलामीवीर फलंदाज महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहता त्याच्या खेळात आत्मविश्वासच दिसला नाही.
गुणवत्तेला योग्य वेळी व सातत्याने संधी मिळाली नाही तर ते ऋतुराजच्या अपयशातून दिसून येते. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांनी नवोदितांना सातत्याने संधी देऊ असे दिलेले आश्वासन केव्हाच हवेत विरले व त्यांच्या आणि निवड समिती व कर्णधार रोहित शर्माच्या पसंतीचेच खेळाडू संघात येतात व ऋतुराजचा केवळ पर्यटक होतो.
स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीच्या सामन्यात ऋतुराज उमेश यादवच्या गोलंदाजीवर नितीश राणाकडे झेल देत बाद झाला. त्याने केवळ 4 चेंडू खेळले. सातत्याने संधी न मिळणे हे महाराष्ट्राच्या खेळाडूंबाबत रणजी करंडक व भारतीय संघात अनेकदा घडले आहे, पण सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला आयपीएल स्पर्धेत सातत्याने संधी दिली व गेल्या वर्षीच्या मोसमात त्याने कामगिरीही सिद्ध केली. मात्र, केवळ आयपीएल ते आयपीएल खेळवले गेले तर तो दर्जा व गुणवत्ता असूनही मागे राहील. मागे एकदा एक माजी कसोटीपटू व निवड समितीचे दोनदा अध्यक्ष असलेले महाराष्ट्राचेच खेळाडू म्हणाले होते, की त्यांना बीसीसीसीआयच्या स्पष्ट सूचना होत्या की, तुम्हाला निवड समितीचे अध्यक्ष बनवले आहे ते केवळ आम्ही निवडलेल्या खेळाडूंच्या यादीवर स्वाक्षरी करण्यासाठी. तुम्ही तुमच्या एकाही खेळाडूचे नाव पुढे करायचे नाही. आता सांगा अशी जर परिस्थिती असेल तर खेळाडूंवर अन्याय होतच राहणार.
असो, ऋतुराजबाबत बोलायचे तर असे वाटते की या स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात ऋतुराज ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहता संधी मिळाली नाही तर खेळाडूचे काय होते
हे दिसून आले.