मुंबई – महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनात 300 आमदारांना मुंबईत मिळणाऱ्या मोफत घरांचा मुद्दा चांगलाच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीही मुंबईत हक्काचं घर देणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर एकच राजकारण पेटलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे समर्थक देखील यावरून नाराज असल्याचं दिसून आलं. शरद पवार यांनी देखील आमदाराना घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आमदारांना घरे देण्याचा महविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. मात्र आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
याउलट गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, अशी पवारांची भूमिका आहे. लवकरच शरद पवार या विषयवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवारांचा सरकाराला घरचा आहेर अशी विरोधकांची टीका होत आहे. मात्र या टीकेला मी किंमत देत नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं.