– अमित डोंगरे
मुंबईतील सोकॉल्ड अभ्यासू क्रीडा पत्रकार कधी कोणत्या खेळाडूला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील काही सांगता येता नाही. मात्र, याच नादात त्यांनी पृथ्वी शॉ याचे काय करून ठेवले आहे हे पाहिले तर गुणी खेळाडूच्या कारकिर्दीची अखेर जवळ येत असल्याचेच संकेत मिळत आहेत.
पृथ्वी शॉ जेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आला तेव्हा त्याला प्रति तेंडुलकर म्हणून नामकरण केले जाऊ लागले. त्याच्याकडे क्रिकेट होते, दर्जा होता, गुणवत्ता होती व कोणत्याही गोलंदाजीचा समर्थपणे सामना करण्याची क्षमताही होती. पण लगेच सचिनचा वारसदार म्हणण्यापर्यंत या काही पत्रकारांची मजल गेली. झाले त्याची रणजी संघात निवड झाली व त्याच्या बॅटमधून धावाही निघाल्या व बाकी सोडा तो स्वतःही स्वतःला सचिनचाच वारसदार समजू लागला व इथेच माशी शिंकली.
आता तर त्याच्या फलंदाजीची त्याच्या फॉर्मची अशी अवस्था झाली आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा आयपीएलही सोडा केवळ गल्ली क्रिकेट खेळण्याच्याच कुवतीचा बनून राहिला आहे. यंदाच्या मोसमात त्याने रणजीसह देशांतर्गत स्पर्धांमध्ये धावा केल्या. मात्र, त्या कोणत्या संघाविरुद्ध व कोणत्या गोलंदाजीसमोर ते देखील पाहिले पाहिजे. त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने तब्बल 8 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले पण तो कधी अडगळीत गेला त्याचे त्यालाही समजले नाही.
काही दिवसांपूर्वी त्याचे आणि एका मॉडेलसह तिच्या मित्रांशी वाद घडले होते. हे प्रकरण आता पोलिसांत आहे. मात्र, त्याचा म्हणे त्याच्या खेळावर व मानसिकतेवर परिणाम झाला म्हणून त्याची कामगिरी होत नाही. याला काही अर्थ नाही. विक्रमादित्य सुनील गावसकर म्हणतात त्याप्रमाणे क्रिकेटच नव्हे तर आयुष्यातही जर-तर याला काही अर्थ नसतो.
तुमच्याकडे दर्जा, गुणवत्ता व जिद्द आहे तर कोणत्याही बाका प्रसंगातूनही तुम्ही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊ शकता. वैयक्तिक आयुष्यात काही का घडेना एकदा का मैदानात उतरले की केवळ एक खेळाडू म्हणून आपल्या संघाच्या विजयासाठी जीवाचे रान केलेच पाहिजे, नाही तर तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू होऊच शकत नाही.
पृथ्वीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गेल्या सहा सामन्यांत 12, 7, 0, 15, 0, 13 अश धावा केल्या आहेत. म्हणजे 8 कोटींत ही कामगिरी. त्यापेक्षा त्याने गल्ली क्रिकेट खेळावे तेच त्याच्यासाठी चांगले ठरेल. विनाकारण एका गुणवान खेळाडूची जागा अडवून धरू नये.