राजगुरूनगर -रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे करून रोजगार निर्मिती करा तसे न झाल्यास गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या वेतनातून कपात करू, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राजगुरूनगर येथे दिला.
करोना विषाणू संसर्ग पार्शवभूमीवर प्रशासकीय यंत्रणांचा आढावा यासह पाणीटंचाई, मान्सून पूर्व तयारी, गळक्या, पडक्या शासकीय इमारती, मोडकळीस आलेले पूल, भूस्कलन होण्याची भीती असलेल्या गावांचे सर्वेक्षण, मान्सून पूर्व तयारी करण्याचे नियोजन करावे, खरीप हंगाम, रोजगार हमी कामे, शरद भोजन योजना, परप्रांतीय कामगारांचे नियोजन याबाबत खेड पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली, त्यावेळी प्रसाद यांनी हा इशारा दिला.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप, खेड पंचायत समितीचे सदस्य भगवान पोखरकर उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले की, लॉकडाऊनमुळे खतांची कमतरता आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. खते, बी-बियाणे भरपूर आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची टीम खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला अडचण होता कामा नये याची काळजी घ्यावी. पाणीटंचाई गावांना अधिकारी व समितीच्या अधिकाऱ्यांनी भेटी द्या. आवश्यक तेथे तात्काळ टॅंकर सुरू केले जातील.
(दि.7) जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही याचे नियोजन करा, पाणी वाटप करताना सोशल डिस्टन्सचे पालन झाले पाहिजे याकडे अधिकरी वर्गाने लक्ष द्यावे.
रोजगार हमीला मोठा वाव
कांदा चाळसाठी अनुदान असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कांदा चाळ देण्याचा प्रयत्न केले जातील तालुका कृषी अधिकारी, कृषी मित्र यांची मदत घेण्यात येणार आहे. तालुक्यात 10 हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे जॉब कार्ड तयार करून रोजगार देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेत 169 प्रकारची कामे आपण करू शकतो तालुक्यात रोजगार हमीला मोठा वाव आहे. 80 टक्के कृषी विभागाकडे रोजगार हमीची कामे आहेत, 20 टक्के कामे तहसील विभागाकडे आहेत. फळबागकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रसाद यांनी केले.
परप्रांतीयांची तपासणी करूनच पाठवा
चाकण परिसरातील काम करणाऱ्या परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. नोंदणी केलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना पाठविण्यात यावे जेणेकरून तिकडे गेल्यानंतर चाकणमधून आल्याने करोना झाला अशी म्हणायची, चाकणला बदनाम करण्याची वेळी येता काम नये. योग्य तपासणी करूनच त्याला त्याच्या गावाकडे जाऊ द्यावे. चाकणमुळे करोना झाला असे म्हणायची वेळ आणू नका.