नवी दिल्ली – पाटणामध्ये विरोधी पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन झाल्यानंतरही ऑपरेशन लोटसमुळे विरोधी पक्षांच्या वज्रमुठीला तडे पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्णपणे विखुरल्यानंतर नितीश कुमार भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातेय.
बिहारमधील राजकीय घडामोडींनंतर अशा प्रकारे नितीश कुमार यांच्याबाबत भाजपबरोबर जाण्याची चर्चा सुरू होण्यामागे एक मोठे कारण आहे. हे कारण म्हणजे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. हरिवंश आणि नितीश कुमार यांच्या भेटीनंतर भाजप आणि नितीश कुमार पुन्हा एकत्र येणार या राजकीय चर्चा सुरू झाल्या.
त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यासाठी एनडीएतील जुना मित्र म्हणून नितीश यांना सोबत घेण्याची तयारी चालली असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर सगळीकडे ऑपरेशन लोटसची चर्चादेखील सुरू झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येदेखील राजकीय वर्तुळामध्ये काहीतरी घडत असल्याची चर्चा आहे.
लवकरच बिहारमध्येही मोठी काहीतरी राजकीय घटना घडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. नितीश कुमार यांचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानात, आता थेट नितीश कुमारच भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हरिवंश हे भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यात मध्यस्थासारखी भूमिका पार पाडू शकतात अशादेखील चर्चा सुरू झाल्या आहेत.