नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दल यांच्यात जवळपास सहमती झाली असल्याची बातमी आहे. त्यानुसार भाजप आणि नितीश यांचा जनता दल गेल्या वेळेप्रमाणेच प्रत्येकी १७ जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिहारमधून लोकसभेवर ४० खासदार निवडून जातात. २०१९ च्या निवडणुकीत यातील ३९ जागा या दोन पक्षांनीच जिंकल्या होत्या. नितीश यांनी गेल्याच आठवड्यात भाजपशी पुन्हा हातमिळवणी करत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये प्रवेश केला असून आता या दोन पक्षांत कोणी किती जागा लढवणार याची सहमतीही झाली असून या महिन्याच्या अखेरपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान, उर्वरीत सहा जागा रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान, चिराग यांचे काका पशुपती पारस यांच्या गटाला आणि उपेंद्र कुशवाह आणि जीतनराम मांझी यांच्यासाठी सोडल्या जाणार आहेत.
हे पक्ष नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचाही प्रस्ताव भाजपकडून दिला जाणार आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला मागच्या निवडणुकीत ६ जागा देण्यात आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नसल्याचे दिसते आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी चिराग पासवान यांनी दिल्लीत गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.
त्यामुळे भाजपकडून चिराग यांना वेगळा प्रस्ताव अगोदरच दिला गेला असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर चिराग यांच्या पक्षात फूट पडून त्यांच्या काकाने वेगळा गट स्थापन केला आहे. त्या गटाला भाजपकडून काय प्रस्ताव दिला गेला आहे ते अद्याप समोर आलेले नाही. मात्र विरोधी इंडिया आघाडीचीच अद्याप जागावाटपाची बोलणीही सुरू झाली नसल्यामुळे आघाडीत सगळी सामसूमच दिसते आहे.