पुणे – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांना वेळीच पायबंद घालण्यासाठी राज्याचा आरोग्य विभागाने “ऍक्शन प्लॅन’ तयार केला असून, यासंदर्भातील आवश्यक सूचना विभागाकडून प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यातील विविध विभागांत तसेच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक असते. काही भागांत पाणीटंचाई तर काही भागात पूरपरिस्थितीला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. या अनुषंगाने आपापल्या कार्यक्षेत्रात जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची सज्जता किती झाली आहे, याचा आढावा घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
साथरोग प्रतिबंध आणि नियंत्रणाचे काम अधिक नेमकेपणाने तसेच मनुष्यबळ आणि उपलब्ध साधन सामग्रीच्या सुयोग्य नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या भागातील जोखीमग्रस्त गावांची यादी तयार केली आहे. राज्यामध्ये आजपर्यंत फक्त कल्याण महापालिकेतील एकाच पूरग्रस्त गावाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 436 लोकसंख्या पुराखाली आली होती. या संदर्भात माहिती ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पंधरवडा सर्वेक्षण कॅलेंडर तयार करण्यात आले आहे.
या कॅलेंडरप्रमाणे गृहभेटीच्या वेळी जलजन्य तसेच कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेणे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही आश्रमशाळा, विद्यार्थी वसतिगृह, वृद्धाश्रम अशा संस्था कार्यरत असतील तर तेथे नियमित भेटी देणे, पाण्याच्या स्त्रोतांची आणि पाण्याची गुणवत्ता तपासणे, तसेच त्या भोवतालची स्वच्छता करणे, नळगळती अशी कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विरंजक चूर्णाचा (टीसीएल पावडर) साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावा; या चूर्णातील उपलब्ध क्लोरीनचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी योग्य साठवणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी मान्सूनपूर्व सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचा सॅनिटरी सर्व्हे करण्यात येतो; त्यानुसार प्रत्येक गावाला हिरवे, पिवळे आणि लाल कार्ड दिले जाते. त्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये एकूण 27 हजार 853 गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे.
साथरोग निदानासाठी सर्व जिल्हयामध्ये प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. उपसंचालक स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, गावपातळीवरील साथरोग सर्वेक्षणात आशा कार्यकर्तींचा सहभाग घेण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित विभागाशी नियमित संपर्क आणि प्रबोधनावर भर देण्यात आला आहे.
हे करा अन् रोग टाळा
- झोपताना मच्छरदाण्यांचा वापर करावा.
- खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
- कीटक होऊ नयेत, यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा.
- जोखमीच्या भागात कीटकनाशक फवारणी करावी.