कोल्हापूर – देशात करोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यातही महाराष्ट्रात दररोज करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. करोना रुग्णसंख्येचा नवा विक्रम रोज होत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कोल्हापूरमध्ये मात्र करोनावर नियंत्रण असल्याचं चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५०० पेक्षा कमी आहे. तर चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तीन टक्क्यांपर्यंत आहे. जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बंध, नागरिकांकडून नियमांचं होणारं पालन आणि आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. नागरिकांकडून प्रशासनाला करण्यात येत असलेले सहकार्य देखील रुग्णसंख्या कमी ठेवण्यात फायदेशीर ठरत आहे.
जिल्ह्यात प्रशासनाने ‘नो मास्क नो एंट्री’ या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. याशिवाय सण आणि समारंभामध्ये कोरोना नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडेसुद्धा येथील प्रशासनाची बारिक नजर आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकही सतर्क झाले. यामुळं कोल्हापुरात कोरोना संसर्ग आटोक्यात येताना दिसतोय.
कोल्हापुरात मागील सहा दिवसांतील सरासरी रुग्णसंख्या ६५च्या खाली आहे. तर अॅक्टीव्ह रुग्ण पाचशेच्या खाली असून स्वॅब तपासणीची संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे.