नवी दिल्ली : देशात केवळ करोनासाठी 586 राखीव रुग्णालये आणि एक लाख विलगीकरण खाटा यांची उपलब्धता आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.त्याचवेळी करोना विरूध्दच्या लढ्याचा सकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट केला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, लॉकडाऊन आणि प्रतिबंधात्मक उपाय हे करोनाच्या लढ्यातील महत्वाची गोष्ट आहे. जर वेळीच आपण याची अंमलबजावणी केली नसती तर यावेळेपर्यंत बाधितांची संख्या 8.2 लाखांवर गेली असती.
केंद्र सरकार राज्यांच्या समन्वयाने हा लढा देत असून त्यांच्या गरजेप्रमाणे पीपीई, एन 95 मास्क, टेस्टिंग किट आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात येत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि योग्य उपचार मिळण्यासाठी 565 करोना राखीव रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
करोना रोखण्याच्या धोरणाची अंमलबजावणी कृती कार्यक्रम करोना बाधितांच्या संपर्कांचा शोध आणि वैद्यकीय व्यवस्थापन ही सरकारपुढील महत्वाची आव्हाने आहेत. ही सर्व प्रक्रिया राज्यांशी समन्वय ठेवून केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.