सोलापूर (प्रतिनिधी) – देशात गेल्या 50 वर्षांत अशी कधी बिकट परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. सध्याची परिस्थिती वर्णनही करण्यापलिकडची आहे. सरकारकडे वेगवेगळे अहवाल येत असून त्या आधारावर सरकार निर्णय घेईल. पण देशात आणीबाणी लावण्याची गरज वाटत नाही. जनतेच्या सहकार्याने स्थिती चांगल्या प्रकारे हातळली जात आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
सुशिलकुमार शिंदे म्हणाले, या स्थितीला तोंड देणे आपले सर्वांचे काम आहे. सरकार आणि डॉक्टरांनी ज्या-ज्या सुचना केल्यात त्या पाळल्या पाहिजेत. दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. यात समाजाचेच भले आहे. याशिवाय आगामी काळात मोठी आर्थिक गंभीर स्थिती देशापुढे उभी राहणार आहे. या स्थितीलाही तोंड देण्याचे सामर्थ्य ठेवले पाहिजे.
दुसरीकडे शेतकरी हवालदील आहेत. लोकांचे रोजगार बुडत आहेत. हे सर्व प्रश्न असल्याने सरकारवरही ताण येणार आहे. त्यामुळे पुढील कारभार काटकसरीने हाताळावा. आणीबाणी लावण्याची गरज नाही. लोकांना स्थिती समजावून सांगा, लोक ऐकतात. वेळीच आपण स्थिती आटोक्यात ठेवली आहे. आणखीन प्रयत्न केले तर जगभरात सोलापूराचे उदाहरण दिले जाईल.
प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती वेगवेगळी आहे. या सर्वाचा अभ्यास करुनच निर्णय घ्यावा लागणार आहे. संपूर्ण देशच या विळख्यात आहे. लोकतरी कितीदिवस घरात कळ काढणार याचाही विचार करावा लागणार आहे. अंत्योदय प्रमाणेच केशरी कार्ड धारकांनाही किमान तीन महिने तरी मोफत धान्य दिले पाहिजे. कारण या लोकांची स्थितीही फारशी चांगली नाही. काम नाही, नुसतच घरी बसायचं आणि घरी अन्नही नाही अशी स्थिती ते तरी कशी सहन करतील. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे सुचना केली असल्याचे त्यांनी सांगितले.