मुंबई – करोना विषाणूमुळे जगभर कोविड-19 या रोगाची साथ पसरलेली असताना, जागतिक आरोग्य संघटनेने ही महामारी असल्याची घोषणा केलेली असताना आणि त्यानंतर जगभरातील नामांकित आणि मोठमोठ्या क्रीडा संघटनांनी आपल्या सर्व क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या असताना किंवा रद्द केलेल्या असतानाही, इंडियन प्रिमियर लीगच्या आठ संघमालकांनी, आयपीएल-2020 ही स्पर्धा लहान स्वरूपात घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीसीसीआयने आयपीएलसह सर्वच क्रिकेटच्या स्पर्धा पुढे ढकलल्याचे जाहीर केल्याने संघमालकांचा हिरमोड झाला.
आयपीएल-2020 चे समयोजन आणि अन्य विषयांना अनुसरून आज (शनिवारी) बीसीसीआयच्या येथील मुख्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाण रद्द केली आहेत, तर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर बंदी घातलेली आहे. असे असताना ही स्पर्धा होणार कशी, याविषयी प्रश्नचिन्हच होते. किंग्ज एलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया म्हणाले की, साथीचा रोग पसरतो आहे, हे खरेच आहे. मात्र, 45 दिवसांच्या प्रदीर्घ कार्यक्रमाऐवजी लहान स्वरूपात ही स्पर्धा घेण्यावर विचार व्हायला हवा होता. आता 15 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे गेली आहे. त्यामुळे त्यानंतर तरी ती सुरू होईल की नाही, याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. याचा अर्थ यंदा ही स्पर्धा होणार नाही, असाच संदेश जात आहे. त्याला अनुसरून आम्ही सर्व संघमालकांनी आणखी काही पर्याय असतील, तर त्यावर विचार करायला, अध्यक्ष सौरव गांगुली यांना सुचवले.
दिल्ली कॅपिटल्सचे संघमालक पार्थ जिंदाल यांनी स्पर्धेच्या पर्यायांवर चर्चा करण्यास नकार दिला. घ्यायची तर पूर्ण स्पर्धा घ्या अन्यथा नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच दोन ते तीन आठवड्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन, स्पर्धेबाबत निर्णय घ्यावा, असेही सुचवले. त्यांच्या मते 15 एप्रिलपर्यंत खूप उशीर झालेला असू शकतो. कोलकता नाईट रायडर्सचा संघमालक, अभिनेता शाहरुख खानने म्हटले आहे की, संघातील खेळाडू, व्यवस्थापनातील सदस्य, स्टेडियममधील प्रेक्षक आणि जेथे आम्ही सामने खेळू, त्या शहरातील नागरिकांचे आरोग्य रक्षण करणे याला आमचे सर्वाधिक प्राधान्य राहीलच. मात्र, जर या साथीच्या रोगाचा प्रभाव कमी झाला, तर ही स्पर्धा अवश्य खेळवावी. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सर्व संघमालकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आणि या आपात स्थितीत संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.