कुमार प्रशांत
आपल्याला चिरपरिचित असलेले जग आपल्या डोळ्यांसमोर बदललेले; बदलताना दिसत आहे. कालपर्यंत ज्यांना आपल्या शक्तीची घमेंड होती, ते आज शक्तिहीन याचक बनल्याचे दिसत आहे. शिल्लक राहिले आहेत केवळ आकडे, मरणाऱ्यांचे आणि आतापर्यंत बचावलेल्यांचे. कुणी माफी मागताना दिसत आहे. वस्तुतः त्याच्या चेहऱ्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा माफीशी कधी मेळ बसत नाही.
असंख्य असहाय लोकांनी समोर मृत्यूला पाहून महानगरातून पलायन केले. त्यांना हेही ठाऊक नाही की ते दुसऱ्यांसाठी मृत्यू सोबत नेत आहेत आणि स्वतःही मृत्यूच्याच दाढेत जाणार आहेत. सत्तेच्या खुर्चीवर बसलेले त्यांना म्हणत आहेत, तुम्ही आमचे शहर सोडून जाऊ नका.
आम्ही तुमच्यासाठी राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करू. परंतु याच सत्ताधीशांनी हीच गोष्ट काही दिवसांपूर्वी सांगितली असती, तर अशा विनवण्या करण्याची वेळ त्यांच्यावर आलीच नसती. आपण पाहू शकतो, जगातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्यांच्या चेहऱ्यांवरील रंग उडून गेले आहेत. करोनाचा मुखवटा लावून मृत्यूने पहिला वार अशा देशांवर केला आहे, जे आधुनिक संस्कृती आणि प्रगतीचा चेहरा बनून संपूर्ण जगात मिरवीत होते. आता सर्वकाही लॉकडाउन आहे. असे जग यापूर्वी कधी पाहिले होते आपण? कधी-कधी आपली आजी खूप आठवून-आठवून आपल्याला सांगत असे की, त्यांच्या गावात प्लेगसारखा महाभयानक आजार कसा वेगाने पसरला होता आणि अखेर गावच शिल्लक उरले नव्हते.
माणसाला जिंकण्यासाठी किंवा हरवण्यासाठी आलेला करोना हा पहिला आजार नाही.आपण हीच गोष्ट वेगळ्या प्रकारे समजून घेऊ शकतो. सृष्टी अस्तित्वात आल्यानंतर खूप-खूप वर्षांनी माणूस अस्तित्वात आला होता. हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळा होता. हा पृथ्वीवर राहण्यासाठी नव्हे; जिंकण्यासाठी आला होता. त्याला इतरांबरोबर सहजीवन नको होते, तर इतरांना काबूत ठेवायचे होते. परंतु सगळेच प्राणी, जीवजंतू आणि विषाणू माणसाला शरण कसे येतील? संपूर्ण सृष्टी मानवाला एकदम वश झालेली नाही. जेव्हा, ज्याला संधी मिळाली तेव्हा त्याने मानवावर हल्ला केला आहे.
आठवून पाहा, गेल्या काही वर्षांत किती प्रकारच्या विषाणूंनी मानवजातीवर हल्ला केला आहे! अनेक साथीच्या आजारांनी माणसाला पृथ्वीवरचा डाग समजून धुऊन काढण्याचा प्रयत्न केला! निसर्गानेही मानवासमोर अनेक प्रकारे प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली. मानवाने हरप्रकारे परिस्थितीशी दोन हात करून आपले अस्तित्व वाचविले. प्रत्येक विजयानंतर मानवाला असे वाटले की, आता सर्वकाही आपल्या मुठीत आले आहे. अशाच धुंदीत असताना करोनाने मानवावर हल्ला केला आहे. पूर्वीच्याच लढाईचा हा नवीन टप्पा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय डॉक्टराने म्हटले आहे की, आम्ही याही शत्रूला हरवू शकू; भले कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. ही जिंकण्याची आणि हरविण्याची भाषाच आपली आदिम भाषा आहे. हाच सर्वांत मोठा विषाणू आहे. ही भाषा बदलायला हवी.
जिंकणे किंवा हरविणे, हिसकावणे किंवा दया करणे, याच्या पलिकडे जाऊन आपल्याला करुणा शिकावी लागणार आहे. प्रत्येकाच्या बाबतीत, निसर्गाच्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत करुणा. दया नव्हे, उपकृत करणे नव्हे किंवा अभय देणेही नव्हे. करुणा मनात ठेवून जीवन जगणे. दया सक्रिय होते तेव्हा तिचे रूपांतर करुणेत होते. आपण निसर्गाकडून कमीत कमी आवश्यक आहे तेवढेच घेतले पाहिजे, असे जेव्हा गांधीजी आपल्याला सांगत असत, तेव्हा ते याच करुणेच्या भूमिकेतून जगायला सांगत असत. ते असेही म्हणत असत की, जे कमीत कमी आपण निसर्गाकडून घेतले आहे, तेही निसर्गाला परत द्यायचे आहे, याचे भान आपण राखायला हवे. लोभ आणि हिंसेच्या प्रेरणेतून सर्वांना ग्रासणारी संस्कृती निर्माण होते. सर्वांत मोठा, सर्वांत जास्त, सर्वांत बलशाली असे निकष करुणेवर वार करतात. सर्वांच्या बरोबर, सर्वांसाठी आणि सर्वांसह जगण्यास शिकणे ही करुणेची पहिली पायरी आहे आणि तेच अंतिम उद्दिष्टही आहे. गरजा वाढविण्यासाठी नव्हे तर गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन करायचे आहे, हे माणसाला शिकावे लागेल.
विकासाच्या सध्याच्या काळात लोक विचारतील की, जगाच्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येची भूक तुमच्या करुणेमुळे भागणार आहे का? याचे उत्तर एवढेच की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लोभ आणि हिंसेपासून मुक्त केले, तर मानवी गरजा किती कमी उरतात हे दिसून येईल. गांधीजी म्हणतात, निसर्ग आपल्यापैकी कुणाचीही हाव पूर्ण करू शकत नाही; परंतु गरजा मात्र कुणाच्याच पूर्ण झाल्याखेरीज राहणार नाहीत. यासाठी काय बदलायचे आहे? करोनाने ग्रासलेला समाज म्हणतो आहे की, यातून बचावून पुढे जायचे असेल तर ते केवळ करुणेच्या आधारेच शक्य आहे.