मुंबई : राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंब लॉकडाऊनमध्येही मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात प्रश्न उपस्थित करत उत्तर देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला धारेवर धरलं. त्यांनी ट्वीट केलं आहे की, “महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळेश्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे घडलं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरणं देणं गरजेचं आहे.”
No lockdowns for mighty & rich in Maharashtra?
One can spend holidays in Mahabaleshwar with official permission from police.
It is not possible that a senior IPS officer would do such gross mistake knowing the consequences on his own.
(1/2) https://t.co/0Ey8j938k8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 9, 2020
लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्याच्या वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र मिळाले. त्यामुळे सामान्यांना एक न्याय आणि श्रीमंत धेंडांना वेगळा न्याय कसा?, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करुन वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.