अनेक विवाह ढकलले पुढे; काहींनी केल्या उपाययोजना
पिंपरी – करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी एकत्र जमू नये म्हणून प्रशासनाने मॉल, शाळा, महाविद्यालये बंद केली. मात्र तोंडावर आलेल्या लग्न मुहूर्ताचे काय करायचे अशी चर्चा लगीनघरी सुरू आहे. काहींनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. तर काहींनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत मुहूर्तावरच लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्च महिन्यात 19 आणि 29 या लग्न मुहूर्ताच्या तारखा आहेत. काहींनी सहा महिन्यांपूर्वी मंगल कार्यालये बुक केली आहेत. मात्र “करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाने केले आहे. लग्नालाही दोन-तीन हजार नागरिक जमतात. यामुळे मार्चमध्ये असलेल्या मुहूर्तावर लग्न उरकून घ्यायचे की लग्नाची तारीख पुढे ढकलायची याबाबत लगीनघरात चर्चा सुरू आहे.
वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात 19 आणि 29 या तारखा लग्नासाठी बुक आहेत. मात्र प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये म्हणून आवाहन केल्याने 29 तारखेला होणारा विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. तर 19 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे 19 तारखेच्या विवाहाबाबत लगीन घरची मंडळीही संभ्रमात आहेत. शहरात एका कुटुंबातील विवाह देखील 19 तारखेला शहराबाहेर तीर्थस्थळी होणार आहे. लग्न दोन दिवसांवर आल्याने आता ते रद्द करणे शक्य नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.
मात्र “करोना’चा प्रसार होऊ नये म्हणून आम्ही दोन हजार मास्क वऱ्हाडी मंडळींना वाटणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच विवाह मंडपात प्रवेश करताना अक्षता घेण्यापूर्वी हात धुवावेत, यासाठी 11 लिटर सॅनिटायजर आणले असल्याचे सांगितले. तसेच जेवणाच्या पंगतीमधील वाढप्यांना मास्क लावून आणि हातमौजे घालून जेवण वाटप करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
“चिंचवडगाव परिसरात पाच मंगल कार्यालये आहेत. या मंगल कार्यालयांना 31 मार्च 2020 पर्यंत कोणतेही कार्यक्रम घेऊ नका, असे जिल्हाधिकारी यांचे आदेश तहसीलदार गीता गायकवाड यांच्या सूचनेनुसार बजावले आहेत. यामुळे मंगल कार्यालयात यापुढील काळात विवाहदेखील होणार नाहीत.”
– अर्चना रोकडे, तलाठी-चिंचवडगाव