नवी दिल्ली – करोना विषाणूंमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कित्येक देशांमध्ये होत असलेल्या मानाच्या स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल झाले आहेत. त्यावरूनच करोनाची व्याप्ती लक्षात येते, त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेकेले आहे.
करोना विषाणूंचा धोका दिवसेदिवस वाढत आहे. या विषाणूंचा प्रसार जगभर होत असल्याचेही दिसून येत आहे. याचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काळजी करत बसू नये तर काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करावी लागली आहे, तसेच इंडियन प्रीमिअर लीगही पुढे ढकलण्यात आली आहे. अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धांचे आयोजनदेखील संकटात सापडले आहे. यातून वेळेत मार्ग निघाला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
करोनाचा फटका केवळ काही मालिकांनाच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राला बसला आहे, यातून प्रत्येकाने बोध घेणे आवश्यक बनले आहे. केवळ आपल्यापुरते न पाहता एकत्र येत याचा सामना करणे आज गरजेचे बनले आहे. या विषाणूंचा प्रभाव कमी झाला नाही तर पुढील 3 ते 4 महिने क्रीडा क्षेत्राचीही प्रचंड हानी होणार आहे, अशी भीतीही कोहलीने व्यक्त केली.