रकमेअभावी महिलांना गुजराण करणे बनले अवघड
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – करोनाचा पोटगीच्या दावा अथवा अर्जांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक महिलांची गुजराण पोटगी म्हणून मिळणाऱ्या रकमेवर होत असते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कामे बंद आहेत. त्यामुळे पगार नसल्यामुळे इच्छा असतानाही अनेक पती पोटगी भरू शकलेले नाहीत. परिणामी, कित्येक महिला घराचे भाडे भरू शकल्या नाहीत. दैनंदिन गरजा भागविणे त्यांना अवघड बनले आहे.
कौटुंबिक न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक काम पोटगी संदर्भात असतात. पोटगीची रक्कम मिळावी, वसूल व्हावी अशा प्रकारचे असतात. मासिक पोटगी रक्कम मिळावी म्हणून अर्ज दाखल करण्याचे प्रमाण यामध्ये अधिक असते. सध्या लॉकडाऊनमुळे न्यायालयात केवळ महत्त्वाच्या दाव्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी होत आहे. पोटगीच्या दाव्यांना पुढील एक ते दोन महिन्यांच्या तारखा दिल्या आहेत. लॉकडाऊननंतर पोटगी वुसूलीबाबतचे अनेक अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
याबाबत भगिनी हेल्पलाइनच्या संस्थापक ऍड. सुप्रिया कोठारी म्हणाल्या, पोटगीचा आदेश असलेल्या महिलेला उत्त्पन्नाचे साधन नाही, हे खरे आहे. पण, पतीच्या सध्या असलेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेलेल्या असून, अनेकांना अर्धाच पगार मिळत आहे. कित्येकांना वाहन, घर आणि इतर कर्जांचे हप्ते आहेत. काहींना आरोग्यविषयक खर्च आहे. त्यामुळे त्यांच्या हातात रक्कम राहात नाही. तर ते पोटगी कोठून देणार. न्यायालय सुरू झाले, तरीही पतींची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे अनेकांना लगेच पोटगीची रक्कम देता येणे शक्य होणार नाही. अशावेळी लहान मुलाच्या पोटगीची रक्कम आणि मंजूर पोटगीच्या रकमेबाबत सामंजस्याने विचार झाला पाहिजे.
थकलेल्या रक्कमेच्या निम्मी अथवा जेवढी शक्य आहे, तेवढी, टप्प्याटप्प्याने रक्कम तरी दिली गेली पाहिजे. ज्यावेळी असे अर्ज दाखल होतील. त्यावेळी त्यामध्ये मानवतेच्या दृष्टीने विचार होणे अपेक्षित आहे. नैसर्गिक परिस्थिती उद्भवली आहे. यात कोणाचाही दोष नाही. पती-पत्नी दोघांवरही अन्याय होता कामा नये, असे ऍड. कोठारी यांनी सांगितले.