मुंबई – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. करोना हातळण्यात महाविकास आघाडी सरकार फेल झाल्याचे म्हणत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर गुप्त बैठक झाली. मात्र, भाजपचे नेते नारायण राणे यांनी अशी बैठक झालीच नाही, असा दावा केला आहे.
नारायण राणे म्हणाले कि, शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर गेलेच नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत अशी कोणतीही बैठक झालीच नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्षं टिकणार नाही. करोनाला रोखण्यात सरकार सपशेल अपयशी त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लावली पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा नारायण राणे यांनी केली आहे. तर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.