नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा फेल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. परंतु, त्याचा काहीच फायदा झालेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला त्यांची पुढची रणनिती काय आहे, हे सांगणं आवश्यक आहे. तसेच पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळताना दिसून आले. आता ते बँकफुटवर खेळत आहेत. त्यांना पुन्हा फ्रंटफुटवर यावं लागेल, असेही ते म्हणाले आहेत.
सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी, जे होणं गरजेचं होतं. ते अजिबात झालं नाही. त्यामुळे देशाला जाणून घेणं गरजेचं आहे की, त्यांची पुढची रणनिती काय असणार आहे. लॉकडाऊन लागू होऊन जवळपास 60 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत आहे.’ पुढे बोलताना ते म्हणाले, ‘प्रवाशी मजूर त्रासले आहेत. सरकार त्यांच्या अडचणी कशा दूर करणार आहेत?’
मोदी सरकार विरोधी पक्षांना गांभिर्याने घेत नाही? या प्रश्नावर राहुल गांधी यांनी सांगितलं की, आमचं काम शासनावर दबाव टाकणं आहे. मी फेब्रुवारीमध्येच सांगितलं होतं की, परिस्थिती आणखी घातक होणार आहे.’ रोजगारा संदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘सरकारला आर्थिक बाजू सावरण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. सरकारने लोकांना पैसे देणं गरजेचं आहे. त्यामुळे गरीबांच्या खात्यांमध्ये 7500 रुपये महिना पैसे ट्रान्सफर करणं आवश्यक आहे.’ असेही राहुल गांधी यांनी म्हटले.