पुणे – सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेत लग्न केलेल्या त्यांनी एका वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, पत्नीने सर्व साहित्यांसह दहा लाख रुपये पोटगीची मागणी केली. पतीने साहित्यासह दहा लाख रुपये व काही साहित्य गहाळ झाल्याने आणखी २० हजार रुपये पत्नीला दिले.
मात्र, साहित्यांमध्ये आजीने दिलेली चांदीची वाटी नसल्याने पत्नीने वाटीचा हट्ट धरला. चांदीच्या वाटीसाठी पत्नीचा हट्ट पाहता वाटी मिळाली तर पत्नीस परत करणार, अशी ग्वाही पतीने न्यायालयासमोर दिली. पत्नीलाही ते मान्य झाल्यानंतर वाटीसाठी रखडलेला घटस्फोट तत्काळ मंजूर झाला.
अनुपमा व अनुज (नावे बदलली आहेत) दोघेही उच्चशिक्षित. तो ३८ वर्षांचा तर ती ३४ वर्षांची. अनुज अभियंता तर अनुपमा गृहिणी. दोघांचा ७ जुलै २०१८ रोजी विवाह झाला. वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर दोघेही लग्नाच्या एका वर्षानंतर विभक्त राहू लागले. त्यानंतर, दोघांनी तडजोड करत न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. यावेळी, अनुज विरोधात दाखल करण्यात आलेली कौटुंबिक हिंसाचाराचा दावा मागे घेण्याचे ठरले.
त्यानंतर, पतीने लग्नात आलेले स्त्रीधन, वस्तू, दहा लाख रुपये तसेच अतिरिक्त वीस हजार रुपये पत्नीस दिले. परंतु, आजीने दिलेली चांदीची वाटी आढळून येत नसल्याने पत्नीने चांदीच्या वाटीसाठी हट्ट धरला. याप्रकरणात, न्यायालयाने पत्नीसह पतीचीही समजून काढल्यानंतर पतीने वाटी सापडली तर परत करेल, अशी ग्वाही दिली अन् वाटीवरून अडलेला घटस्फोट तत्काळ मंजूर झाला. पतीतर्फे अॅड. सिध्दार्थ देशपांडे यांनी काम पाहिले.
न्यायालयाची समजूत महत्त्वाची…
साहित्य गहाळ झाल्याच्या बदल्यास पतीने अतिरिक्त वीस हजार रुपये दिले आहे. आजीने दिलेली वाटी असल्याने या भावानाही महत्त्वाच्या आहेत. मात्र, परस्पर संमतीच्या प्रकरणातही चार वर्षे वाया गेली. काहीवेळा तडजोड ही करावीच लागते. वाटीची मागणी कायम राहिल्यास हा दावा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. काही वर्षानंतर वस्तू आहे तशा मिळत नाही. बर्याच प्रकरणात या गोष्टी झाल्या असल्याचे न्यायालयाने पती व पत्नीला समजावून सांगितले.
“पत्नीला चांदीची वाटी तिच्या आजीने दिली होती. वाटी खेरीज अन्य वस्तूही गहाळ होत्या. त्याकडे, पत्नीने दुर्लक्ष केले. परंतु, आजीने दिलेली असल्याने वाटीमागे भावना होत्या. यामुळे परस्पर संमती असूनही या प्रकरणास चार वर्षे लागली. अखेर, पतीनेही गहाळ वस्तू झाल्याचे मान्य करत पत्नीची घालमेल पाहून ती शोधून सापडल्यास परत करण्याचा समजूतदारपणा दाखविल्याने घटस्फोटाचे प्रकरण निकाली निघाले.” – अॅड. राणी कांबळे-सोनावणे , पत्नीच्या वकील