कामशेत, दि.23 (वार्ताहर)- मावळ तालुक्यात सन 2017 मध्ये 45 अंगणवाड्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील 14 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे; तर 31 अंगणवाड्या अपूर्ण अवस्थेत आहे. प्लास्टरशिवाय उभ्या असलेल्या या अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित असल्याचे तालुक्यातील चित्र आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अंगणवाडीमध्ये सुरूवात होते. याशिवाय याठिकाणी बालकांचे लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण, स्तनदा मातांना पोषण आहाराचे वाटप अशा एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या विविध योजनांची याठिकाणी अंमलबजावणी केली जाते. गावातील महिलांना एकत्र येण्याचे हे हक्काचे ठिकाण असते. याशिवायगावपातळीवरील विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे प्रत्येक गावाच्या सामाजिक ओळखीमध्ये अंगणवाड्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो.
याबाबत पंचायत समिती वडगाव समाजकल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधला असता तालुका विभागीय अधिकारी विशाल कोटागडे यांनी सांगितले की पुणे जिल्हा परिषदे कडून बांधकाम निधी साडे आठ लाख रुपये मंजूर होतात. पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी साडेआठ लाखात इमारतीचे ठेकेदाराकडून काम पूर्ण करून देतो. पंचायत समिती चे अधिकारी काम पूर्ण झाल्याचे पत्र समाज कल्याण विभगास देतात पण प्रत्यक्षात हे काम पूर्ण झालेले नसते. ठेकेदार सांगतात की साडेआठ लाखात जेवढे काम होते तेवढेच काम करतो.
याबाबत पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे तालुका अधिकारी धनराज पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला जो शासना कडून साठे आठ लाख रुपये एका अंगणवाडी साठी मंजूर होतात त्या मंजूर रक्कमेतून फक्त इमारत तयार होत.े राहिलेली इमारत स्थानिक ग्रामपंचायतीने पूर्ण करावयची असते. पण ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होते. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती फारशा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. अंगणवाडी बांधकामाबाबत ग्रामपंचायत उदासीन असते. त्यामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत मधून निधी उपलब्ध करून देणे किंवा देणगीदार सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण करून घ्यायचे असते.
लोकवर्गणीतून काम पूर्ण करण्याचा पर्याय
ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये गावपातळीवरील महत्वाच्या घडामोडी होत असतात. मात्र निधीअभावी या इमारती अर्धवट अवस्थेत आहेत. यामध्ये अंगणवाडीच्या इमारतीचे बाहेरचे प्लास्टर, फरशी, खिडक्या, दरवाजे, वीज जोडणी, नळ, किचन ओटा, बाथरूम इत्यादी किरकोळ स्वरूपाची कामे राहून जातात. ही काम कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक ठिकाणी खिडक्या, दरवाज्यांची कामे लोकवर्गणीतुन केली असून, या इमारती वापरात आणल्या आहेत.