संतोष पवार
सातारा – ग्रामीण भागात शेती आणि दुग्ध व्यवसायावर अनेक कुटुंबाचा गाडा चालत असतो. करोना संकटाने शेती, उद्योग व्यवसाय अडचणीत आल्यानंतर आता कुठं तरी गाडी रुळावर येत आहे असे वाटत असतानाच लंपी स्किन या जनावरांच्या त्वचा आजाराचा उदय झाला.
या आजाराने राज्यातील अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवला असून सातारा जिल्ह्यातही नऊ तालुक्यांतील 67 गावांत त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या 10 दिवसात 37 जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. या संकटाच्या काळात कमी मनुष्यबळ असतानाही पशुसंवर्धन विभाग गतीने उपचार देत यंत्रणा राबवत आहे. जास्तीत जास्त लसीकरण करुन पशुपालकांना धीर देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. या संकटाच्या काळात घाबरुन न जाता लंपी आजाराला आळा घालण्यासाठी पुशपालकांनी आपले पशुधन काळजीपूर्वक सांभाळण्याची गरज आहे.
जगभरात मार्च 2020 पासून सलग दोन वर्षे करोनाने अक्षरशः थैमान घातले. या आजाराच्या भीतीनेच अनेकांनी आपला जीव गमावला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष सोडून गेला. करोनासारखे दुसरे भयंकर संकटच असून शकत नाही. या संकटाने होत्याचे नव्हते केले. आजही करोना काळ समोर आला तर अंगावर शहारे येतात. आता करोना गेला आणि लंपी स्किन नावाचा जनावरांचा त्वचा आजार उदयास आला.
या आजारानेही जनावरांची अपरिमित हानी होत आहे. पशुधनाला यामुळे धोका निर्माण झाला असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात 37 जनावरांचा मृत्यू आणि 540 जनावरे बाधित ही आकडेवारी काळजी वाढवत आहे. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पशुधन वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहे. जिल्ह्यातील 634 खासगी पशुपदविकाधारक डॉक्टरांनाही प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने करोना संकटावर विविध उपक्रम राबवून मात केली. हे संकट जरी भयानक वाटत असले तरी शेतकरी, पशुपालकांनी प्रशासनास साथ दिल्यास निश्चितच याही संकटावर मात करण्यात यश मिळणार आहे.
लंपी स्किनचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा, पाण्यामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मि. मी. व्यासाच्या गाठी येत असून जनावरांना ताप येऊन नाकातून चिकट स्त्राव येत आहे. चारा कमी खाणे, पाणी कमी पिणे, दुध उत्पादन कमी होणे, पायास सूज येणे आदी या आजाराची लक्षणे आहेत.
हा आजार बरा होणार असून पशुपालकांनी आपले पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. करोना काळात अफवा व भीतीमुळे अनेकांचा बळी गेलाच शिवाय उद्योग व्यवसायही अडचणीत आले. आता लंपी स्किनबाबतही अफवांचा पाऊस पडत आहे. या अफवांवर विश्वास न ठेवता पशुपालकांनी नजिकच्या शासकीय पशु वैद्यकीय दवाखान्याशी तात्काळ संपर्क साधून आपल्या पशुधनाचे संरक्षण करण्याची गरज आहे. कारण शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर आधार असलेला दुग्धव्यवसाय अडचणीत येऊ नये, यासाठी हा लढा आपण जिंकलाच पाहिजे.