थिरूवनंतपूरम – इंडिया आघाडीचे घटक असूनही कॉंग्रेस आणि डावे पक्ष केरळमध्ये स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आता प्रचार शिगेला पोहचला असताना त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यांच्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरूनही शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे.
भाजपचे नगण्य राजकीय अस्तित्व असणाऱ्या केरळमध्ये डाव्या पक्षांची सत्ता आहे. त्या राज्यात डावे पक्ष आणि कॉंग्रेस हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे त्या पक्षांनी इंडियाचे घटक असूनही केरळमध्ये एकमेकांविरोधात दंड थोपटले. आता प्रचारावेळी त्यांच्यात इतर मुद्द्यांप्रमाणेच राहुल यांच्यावरूनही जुंपत आहे. मागील वेळी (वर्ष २०१९) राहुल केरळच्या वायनाडमधून विजयी झाले.
यावेळी विद्यमान खासदार म्हणून पुन्हा ते त्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, राहुल यांनी पुन्हा केरळमधून निवडणूक लढवण्याची बाब डाव्या पक्षांना रूचलेली नाही. त्यासाठी ते पक्ष इंडिया आघाडीच्या स्थापनेमुळे राजकीय समीकरणे बदलल्याकडे लक्ष वेधत आहेत. राहुल यांनी निवडणूक लढवण्यासाठी वेगळे राज्य निवडायला हवे होते. थेट भाजपशी मुकाबला असणाऱ्या राज्याची निवड त्यांनी करायला हवी होती, असे डाव्या पक्षांचे म्हणणे आहे. वायनाडमधून डाव्या पक्षांनी भाकपच्या नेत्या ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे.
राहुल यांच्यावरून डाव्या पक्षांकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेण्याचे धोरण आता कॉंग्रेसनेही अवलंबले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी पलक्कडमध्ये पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. इंडियाचे घटक असल्याने डाव्या पक्षांनी राहुल यांच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता.
राहुल विद्यमान खासदार आहेत. तसेच, इंडियाचा चेहरा आहेत. राहुल यांना पाठिंबा देऊन डाव्या पक्षांनी राजकीय शिष्टाचाराचे पालन करायला हवे होते. ते पक्ष इतरत्र कॉंग्रेससमवेत प्रचार करत आहेत. राहुल यांच्या नावाचा आधार घेऊन मतं मागत आहेत, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.