पुणे, दि. 13 -कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असताना पुणे जिल्हा परिषदेने मात्र शाळा एकत्रिकरणाचा नावीन्यपूर्ण प्रयोग राबविला आहे. वेल्हे तालुक्यातील 16 गावच्या 16 शाळा एकत्र करून जिल्हा परिषदेने राज्यापुढे नवा “पुणे पॅटर्न’ मांडला आहे. शाळा एकत्रिकरणामुळे पटसंख्या वाढणार असल्याने त्या बंद करण्याची भीती दूर झाली आहे.
राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यानंतर 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद अथवा लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून सुरू आहेत. या निर्णयास सर्व स्तरांतून टीका होत आहे. पुणे जिल्ह्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांची संख्या 1 हजार 54 इतकी आहे. या शाळा बंद होणार असल्याच्या चर्चेने पालक चिंताग्रस्त आहेत. तसेच शाळा बंद झाल्यास अतिरिक्त ठरणार असल्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या शाळा एकत्रिकरणाच्या प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
शाळा एकत्रिकरणाचा पहिलाच प्रयोग पानशेतमध्ये राबविण्यात येत आहे. या परिसरात शाळामध्ये पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थी एकाच वर्गखोलीत एकत्र शिक्षण घेत आहेत. त्यातून दोन शिक्षकांमधून सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण देणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. मात्र पटसंख्या कमी असल्यामुळे सोयीस्करपणे जिल्ह्यात काही शाळा सुरू आहे. त्यातून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षणही मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे पानशेतमध्ये परिसरातील कमी पटसंख्येच्या 16 शाळा एकत्र करीत एकाच ठिकाणी शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे 16 शाळा एकत्र केल्यानंतर आणखी 9 शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकाचा प्रश्न सुटला आहे. पानशेतमध्ये “सीएसआर’च्या मदतीने 16 वर्गखोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता, वाहतुकीची सुविधा दिली जाणार आहे.
प्रयोग यशस्वी ठरणार
मुलांटा बौद्धिक, शारीरिक व भावनिकदृष्ट्या विचार करता शाळा एकत्रिकरणाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात एक-दोन शिक्षकी शाळा सुरू आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शिक्षण होईल, या विषयी साशंकता आहे. मात्र शाळा एकत्रिकरणातून मुलांना सामूहिक पद्धतीने शिक्षण पूरक ठरणार आहे. त्यादृष्टीने हा प्रयोग निश्चितच यशस्वी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.