ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या टी-ट्वटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, केवळ एखाद्या पराभवानंतर अशा प्रकारची चर्चा सुरू करणे योग्य नसले तरी सध्याच्या भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध खेळाडूंच्या सरासरी वयाचा विचार करता कधी ना कधी भारतीय क्रिकेटच्या पुनर्रचनेचा विषय समोर येणारच आहे.
एकीकडे भारतीय क्रिकेटची बेंच स्ट्रेंथ म्हणजेच राखीव खेळाडूंची फळी मोठ्या प्रमाणावर तयार असताना अद्यापही गुणवान खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध होत नाही, हे वास्तवसुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही. सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर नजर टाकली तर विराट कोहली, रोहित शर्मा, अश्विन, दिनेश कार्तिक या सर्वांनी वयाची तिशी कधीच पार केली आहे आणि सर्वजण पस्तिशीकडे झुकू लागले आहेत. तर दीर्घकाळ भारतीय संघातर्फे गोलंदाजी करणारे भुवनेश्वर, मोहम्मद शमी आता थकल्यासारखे वाटतात. महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये निर्णायक क्षणी चांगली कामगिरी करण्याची हमी या सीनियर खेळाडूंकडून सध्या तरी मिळत नाही. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज विराट कोहली सध्या जरी फॉर्ममध्ये परत आला असला तरी त्याच्या एकट्याच्या जीवावर किंवा सध्या अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या भरवशावर भारतीय क्रिकेट नेहमीच विजयी होऊ शकत नाही, हे वास्तव स्वीकारावे लागेल.
सूर्यकुमार यादवनेही वयाची तिशी ओलांडली आहे. मात्र त्याला भारतीय क्रिकेटमध्ये जरा उशिराच संधी मिळाली आहे. या संधीचे सोने तो करत असल्यामुळे त्याच्या नावाची सध्या चर्चा आहे. पण सध्या असे अनेक खेळाडू बाहेर वाट बघत आहेत ज्यांना भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व करायला आवडेल. मूळ वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय क्रिकेटच्या पुनर्रचनेबाबत गांभीर्याने विचार करेल, अशी आशा ठेवायला हरकत नाही. रोहित शर्मा, विराट कोहली किंवा अश्विन यासारख्या सीनियर खेळाडूंनी आतापर्यंत भारतीय क्रिकेटची अतिशय चांगली सेवा केली आहे आणि अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण सध्या ज्या प्रकारे क्रिकेट स्पर्धात्मक पद्धतीने खेळले जात आहे ते पाहता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या दमाचे आणि नव्या रक्ताचे खेळाडू येणे अतिशय महत्त्वाचे आहे. जगातील सर्वात मोठे फ्रेंचाइजी क्रिकेट असलेल्या भारताच्या आयपीएलमध्ये अनेक संघ खेळत असल्याने या संघांमध्ये अनेक गुणवान खेळाडू प्रतिभा दाखवत आहेत. सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू आयपीएलच्या माध्यमातूनच नजरेत आला होता आणि त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. अशाच प्रकारे ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, शुभम दुबे, शार्दुल ठाकूर असे अनेक खेळाडू सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कायमस्वरूपी संधी मिळण्याची वाट बघत आहेत.
गेल्या काही काळामध्ये सातत्याने अपयशी ठरूनही केएल राहुल असो किंवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत असो त्यांना भारतीय संघात कायम ठेवल्यामुळे एकीकडे टीकेचा भडीमार होत असतानाच यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी करणारे आणि फलंदाजीतही गुणवत्ता दाखवणारे ईशान किशन किंवा संजू सॅमसन यांना मात्र अद्यापही कायमस्वरूपी संधी मिळत नाही, हा विरोधाभासही लक्षात घेण्याची गरज आहे. विविध राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेटपटू समोर येत आहेत की क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये स्वतंत्र संघ निर्माण होऊ शकतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टप्प्याटप्प्याने कसोटी क्रिकेट, एक दिवसीय क्रिकेट आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच प्रकारे आता सीनियर खेळाडूंबाबत क्रिकेट नियमक मंडळाला विचार करावा लागणार आहे.
कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि टी20 क्रिकेट या तीनही प्रकारांसाठी जर स्वतंत्र तीन संघ निर्माण केले तर अनेक गुणवान खेळाडूंना संधी मिळू शकेल. रोहित आणि अश्विनसारखे वरिष्ठ खेळाडू कसोटी क्रिकेटसारख्या दर्जेदार क्रिकेटमध्ये आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करू शकतील. क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये समान क्षमतेने खेळणारा विराट कोहली सारखा एखादा अपवाद वगळता सर्वांनाच अशाप्रकारे आपल्या खेळात बदल करणे शक्य नसते म्हणूनच क्रिकेटची पुनर्रचना करण्याच्या निमित्ताने का होईना क्रिकेट नियमक मंडळाने आणि निवड समितीने अशा प्रकारे तीन संघ निर्माण केले तर अनेकांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळेल. आयपीएलमध्ये खेळताना खेळाडू जेवढी जिद्द आणि क्षमता दाखवतात तेवढी जिद्द आणि क्षमता भारताचे प्रतिनिधित्व करताना दाखवली नाही, अशी अप्रत्यक्ष टीका भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांमध्ये भारताला आयसीसी पुरस्कृत एकही जागतिक क्रिकेट स्पर्धा जिंकता आलेली नाही. द्विपक्षीय म्हणजे दोन देशांमध्ये जेव्हा भारत खेळत असतो तेव्हा भारताची कामगिरी जरी उजवी होत असली तरी अनेक देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत नेहमीच भारताच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते ही परिस्थिती जर बदलायची असेल तर भारतीय क्रिकेटच्या पुनर्रचनेचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आयपीएलसारखे व्यावसायिक क्रिकेट असो किंवा रणजी क्रिकेटसारखे स्थानिक क्रिकेट असो या क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना भारतीय क्रिकेट संघात संधी दिली, तर भारतीय क्रिकेटचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असू शकेल.
एखाद्या खेळाडूच्या भूतकाळातील कामगिरीवर त्याला कितीकाळ संघात ठेवायचे याचा विचार आता क्रिकेट नियामक मंडळाला आणि निवड समितीला करावाच लागणार आहे. आयसीसी पुरस्कृत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये अशाप्रकारे अपयशाचा सामना केल्यानंतर जर पुन्हा पुन्हा तीच चर्चा होत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे आगामी दोन ते तीन वर्षांमध्ये होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा विचार करता आतापासूनच भारतीय क्रिकेटच्या पुनर्रचनेचा विचार करायला हवा आणि हा विचार प्राधान्याने अमलातही आणायला हवा.