नाशिक – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची तर औरंगाबाद, नागपूर, कोंकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजित तांबे (अपक्ष) यांच्या उमेदवारीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विशेष म्हणजे काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे असं विधान माध्यमांशी बोलतांना केले आहे. ते पुढे म्हणाले,’काँग्रेसची स्थिती अधिकच वाईट होत असून 2047 पर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येणार नाहीत, असा मोठा दावा भाजप नेत्याने केलाय. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’काँग्रेसचं डुबतं जहाज असून एक दिल के टुकडे हुए हजार अशीच अवस्था आहे. काँग्रेसमध्ये बुथ लेव्हलपर्यंत कोणी काम करायला तयार नाही. नेतृत्व नाही म्हणून कार्यकर्ते अस्वस्थ आहे. 2047 पर्यंत काँग्रेस पक्षाला काही चांगले दिवस नाही. हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजलं आहे. त्यामुळे 30-30 वर्ष आता काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य खर्ची घालायचं नाहीये. तिथे गेल्यावर आजही तिच परिस्थिती आहे. नेत्याचा मुलगा आमदार खासदाराचा खासदार ही काँग्रेसची परिस्थिती आहे. अजूनही नेते आपल्या मुलांना प्रमोट करायला कामाला लागले आहेत.त्यामुळे कार्यकर्ते अस्तित्वात नाही, असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.