कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांचे मोठे विधान
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागले आहे. कारण दिल्लीचे तख्त कोण राखणार हे आज मतमोजणीनंतर कळणार आहे. दरम्यान, या मतमोजणी दरम्यान, आम आदमी पक्ष आणि भाजप या दोनच पक्षांमध्ये चुरस सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र या मतमोजणीत कॉंग्रेस कुठेच दिसत नाही कारणही तसेच आहे. पक्षाने अत्यंत निराशाजनक प्रदर्शन केले आहे. कॉंग्रेसला अजून तरी खाते उघडता आलेले नाही. दिल्लीतील पक्षाच्या कामगिरीवर बोलताना कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीमध्ये कॉंग्रेससाठी काही नव्हतेच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीमध्ये विकासाच्या अजेंडयाचा विजय झाला आहे. मी केजरीवाल यांचे अभिनंदन करतो. या निवडणुकीत कॉंग्रेससाठी काही नव्हतचे असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. सलग तिसऱ्यांदा दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार येणार आहे.
70 पैकी 58 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपा 12 तर कॉंग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. 2015 मध्ये कॉंग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा जिंकता आलेली नव्हती.
आपने ही निवडणूक विकासाच्या मुद्दावर लढवली तर, भाजपाने या निवडणुकीला राष्ट्रवादाचा रंग दिला होता. या दोन पक्षांच्या लढाईत कॉंग्रेस कुठेही नव्हती. 2015 मध्ये आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. भाजपाला फक्त 3 जागांवर विजय मिळवता आला होता.