अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची चर्चा
पुणे – महाविकास आघाडी सरकारने विविध विभागांतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या कधी रद्द होणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
राज्यात कोणतेही सरकार आले, तरी ते आपल्या मर्जीतील व्यक्तीना विविध विभागाच्या अशासकीय सदस्यपदी संधी देऊन खूश करत असतात. या सदस्यांना मानधन मिळत नसले, तरी बैठक व त्यासाठीचा प्रवास भत्ता मिळत असतो. दरमहा ठराविक मानधन मिळावे, अशी मागणी सदस्यांकडून अनेकदा करण्यात आली. मात्र त्याबाबत सकारात्मक निर्णयच घेण्यात आलेला नाही. यामुळे सदस्यांना पद मिळाल्याचा आनंद मानण्यात समाधान मानावे लागते. ही परंपरा कायम आहे.
शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळ, बालभवन यासह इतर बहुसंख्य विभागातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेऊन तात्काळ त्याबाबतचे आदेशही जारी करण्याला प्राधान्य दिले आहे. आता परीक्षा परिषदेतील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांबाबतचा निर्णय रखडला आहे. परिषदेतील विविध समित्यांवर 9 अशासकीय सदस्यांच्या पूर्वीच नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.