नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशात जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी पुन्हा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की अर्थपुर्ण सामाजिक न्यायाचे तत्व लागू करण्यासाठी आणि ओबीसींसाठी विश्वासार्ह डेटा बेस तयार करण्यासाठी अशी जनगणना आवश्यक आहे.
त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात याआधी अनेक वेळा ही मागणी मांडली आहे. इतर अनेक विरोधी पक्षांचे नेतही हीच मागणी करीत आहेत असेही त्यांनी यात नमूद केले आहे.
यूपीए सरकारने 2011-12 मध्ये पहिल्यांदाच सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना केली होती. देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते. त्यानुसार सन 2021 मध्ये ही जनगणना होणे अपेक्षित होते परंतु ती अद्याप घेण्यात आलेली नाही असे त्यांनी नमूद केले आहे.
ही जनगणना तात्काळ सुरू करण्यात यावी आणि जातनिहाय लोकसंख्या किती आहे याचीही स्वतंत्र नोंद करावी अशी मागणीही खर्गे यांनी केली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की “जितनी आबादी, उतना हक! या धोरणासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे.
काल कोलार येथे एका सभेला संबोधित करताना, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना 2011 च्या जाती-आधारित जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले. आणि आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली.