बंगळुरू – कर्नाटकातील ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज भाजप सोडल्यानंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या आदि नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने कॉंग्रेस मध्ये आणखी जोष भरला असून आम्ही दीडशे जागा जिंकण्याचे जे उद्दीष्ठ ठेवले आहे ते सहज साध्य होईल असा आम्हाला विश्वास निर्माण झाला आहे असेही खर्गे यांनी त्यांचे स्वागत करताना नमूद केले.
यावेळी बोलताना शेट्टर म्हणाले की, मी काल भाजप मध्ये होतो आणि आज कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. मी अत्यंत खुल्या दिलाने कॉंग्रेस मध्ये आलो आहे. भाजपने मला सन्मान दिला पण मीही पक्षासाठी खूप खस्ता खाल्ल्या. पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी मोठे योगदान दिले आहे. हुबळी धारवाड मतदार संघातून मी सहा वेळा निवडून आलो आहे. मला याही वेळी तिकीट मिळेल अशी खात्री होती.
पण माझ्या विषयी पक्षात राजकारण झाले आणि मला तिकीट नाकारले गेले. त्यापुर्वी कोणीही पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला नाही. पण मी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर काहीं भाजप नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधून मला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे बोलणे एखाद्या लहान मुलासारखे होते. त्यांनी मला अत्यंत हीन वागणूक दिली. डी. के शिवकुमार, सिद्धरामैय्या, सुर्जेवाला, एम बी पाटील अदि ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधून मला कॉंग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले. ते मी खुल्या दिलाने स्वीकारले आहे.
यावेळी त्यांचे स्वागत करताना सिद्धरामैय्या म्हणाले की खट्टर यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असली तरी ते मनापासून सेक्युलर आहेत. मी मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही. एक प्रामाणिक नेते म्हणून ते परिचीत आहेत.त्यांच्या विषयी कोणताही वादही झालेला नाही. त्यांचे पक्षात स्वागत करताना सुर्जेवाला यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने नवीन इतिहास, नवीन धडा, नवा अध्याय सुरू झाला आहे.
सहा वेळा आमदार राहिलेल्या त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याचे आम्ही कॉंग्रेस कुटुंबात मनापासून स्वागत करीत आहोत. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांनी म्हटले आहे की ते या प्रदेशातील एक महत्वाचे नेते आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा, गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत मोठे पद देण्याचीही तयारी दर्शवली होती. जर ते भाजप मध्येच राहिले असते तर त्यांच्यासाठी ते चांगलेच झाले असते अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.