सोलापूर – गेल्या दोन वर्षात करोना संसर्गाचा आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. तसेच यंदा करोना निर्बंध हटविल्याने आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर सर्व सोयी-सुविधा तयार ठेवाव्यात, असे आदेशपालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नियोजन भवन येथे आषाढी वारी 2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. या बैठकीला आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. भरणे म्हणाले, आषाढी वारी सोहळा आनंदी व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. आषाढी वारीत वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधित विभागाने घ्यावी.
पालखी मार्ग, विसावा आणि वारकऱ्यांचे मुक्काम ठिकाणच्या रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करा. प्रत्येक विभागाला कामे नेमून द्यावीत. स्वच्छता, शौचालय सुविधा, इतर डागडुजीकडे लक्ष द्यावे. पोलीस, आरोग्य, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने नियोजनपूर्व तयारी करावी. प्रत्येक पालख्यांचा विसावा, मुक्काम, रिंगण ठिकाण यांच्या जागेबाबतच्या अडचणी सामंजस्याने सोडविल्या जातील. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी मुरमीकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.