माझे माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तिरी।।
बाप आणि आई ।।
माझी विठ्ठल रखुमाई।।
आषाढी पायीवारी पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होते तशीच ही विठ्ठलरुपी भक्तीची गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते, ती म्हणजे पालखी दिंडीच्या स्वरुपात. लाखोंच्या संख्येने वारकरी विविध संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. दरवर्षी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या ही वाढतच चाललेली आहे. सोहळ्यात मोठा जनसमुदाय असल्यामुळे निश्चितच वारकरी, दिंडी प्रमुख यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी वारकऱ्यांच्या समस्या संस्थान कमिटी, प्रशासनाकडे मांडण्यासाठी, पाठपुरावा करण्यासाठी व्यवस्था असावी या पार्श्वभूमीवर दिंडी प्रमुख आणि संस्थान कमिटी यांच्यामधील दुवा म्हणून 1979 साली “श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज’ या संघटनेची स्थापना झाली.
संघटनेत केवळ दिंडीप्रमुखांचा सहभाग
दिंडी समाज संघटनेची स्थापनाच मुळात दिंडीप्रमुख वारकरी यांच्या समस्या शासन दरबारी, संस्थान कमिटीकडे मांडण्यासाठी झाली आहे. त्यामुळे या संघटनेत केवळ दिंडीप्रमुखांनाच सहभागी केले जाते. या संघटनेच्या कार्यकारिणीत 11 जणांचा समावेश असतो. दर पाच वर्षांनी ही कार्यकारिणी बदलली जाते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सदस्य आदी पदे असतात. विद्यमान पदाधिकारी शिफारस करतात आणि नवीन कार्यकारिणी स्थापन होते.
कुठे आणि किती होतात बैठका?
प्रामुख्याने आषाढी वारीचे नियोजन आणि समस्या मांडण्यासाठी किमान पाच बैठका घेतल्या जातात. चैत्री वारीवेळी आषाढी वारीच्या नियोजनासाठी पंढरपूरात बैठक घेतली जाते. यावेळी पालखी सोहळ्या दरम्यान दिंडी प्रमुखांच्या समस्या सूचना, संस्थान कमिटीकडून दिंडी प्रमुखांना सूचना यासंदर्भात चर्चा होते. त्यानंतर आवश्यकता भासल्यास आषाढी वारी प्रस्थान सोहळ्याच्या आधी तसेच पालखी सोहळ्यादरम्यान, ज्या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो त्याठिकाणी सासवड, फलटण, लोणंद, शेगाव आदी ठिकाणी बैठक घेतली जाते. या बैठकीला दिंडी समाजचे पदाधिकारी, आरफळकर वंशज प्रतिनिधी, चोपदार, शितोळे सरकार, माऊली संस्थानचे विश्वस्त, सोहळाप्रमुख, वासकर महाराज यांची उपस्थिती असते. ही बैठक शितोळे सरकार यांच्या जरी पटक्याच्या पालावर घेतली जाते.
समाज आरतीच्या वेळी दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी होणाऱ्या बैठकीची वेळ सांगितली जाते. बैठकीत दिंडीकरी, वारकऱ्यांच्या समस्या, पालखी तळ, जागेचा प्रश्न, स्वच्छता, परंपरेच्या संदर्भातील प्रश्न आदी प्रश्नांवर चर्चा करून सर्वानुमते मार्ग काढला जातो. ही संघटना आषाढी वारी पालखी सोहळा तसेच कार्तिकी वारी संजीवन समाधी सोहळा यावर प्रामुख्याने कार्यरत असते, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब मनोहर महाराज गोसावी यांनी दिली.