सोलापूर – “गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’ या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची या काल्याने सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
“उपजोनियां पुढती येऊं। काला खाऊं दही भात
वैकुंठी तो ऐसें नाही। कवळ कांही काल्याचें
एकमेकां देऊ मुखी, सुखी घालू हुंबरी’
या संत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव झाला. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले.
“पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोला’चा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या.
सकाळी 9.20च्या सुमारास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची, तर 9.30च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत केले.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यासह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.
तत्पुर्वी गोपाळपुर येथील श्रीकृष्ण मंदीरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, गोपाळकाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसह सर्व संतांचे पालखी सोहळे आता परतीच्या मार्गावर मार्गस्थ झाले आहे.