– हेमंत देसाई
पाकिस्तान हे अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असूनही त्या देशाला कटोरा घेऊन सगळीकडे कर्जासाठी हिंडावे लागत आहे. ही उधारउसनवारी करणे हे अपमानास्पद वाटते, अशी भावना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या कायदेशीर संकटात सापडलेले नेते इम्रान खान हे सत्तेत असताना व त्या आधीही सतत भारताच्या विरोधात गरळ ओकत असत. परंतु आता त्यांनी अचानकपणे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. “क्वाडचे सदस्य असूनही अमेरिकेच्या दडपणापुढे न झुकता भारताने रशियाकडून कच्चे तेल मिळवले. माझ्या सरकारकडूनही अशाच प्रकारे स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न सुरू होते’, असे इम्रान यांनी म्हटले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकांआधी, मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा इम्रान यांनी व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानाने भारतातील कोणता नेता पंतप्रधान व्हावा, याबद्दल पूर्वी कधीही भाष्य केलेले नव्हते. इम्रान यांनी मोदी यांची स्तुती करण्यामागे त्यांचा स्वतःचा काही अजेंडा असणारच. परंतु इम्रान यांना पाकिस्तानची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही आणि आता शाहबाज शरीफ पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था पूर्णपणे घसरली आहे.
2023च्या अखेरीस जगात मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेपासून मंदीची ही लाट सुरू होईल, असा अंदाज आहे. परंतु पाकिस्तानात आताच मंदी आली असून, तेथे महागाईचा दर 35 टक्क्यांवर गेला आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बॅंकेने कर्जावरील व्याजदर तब्बल 100 अंशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून, या बॅंकेचा किमान व्याजदर 21 टक्के झालेला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाने 280 रुपयांपर्यंत गटांगळी खाल्ली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकमध्ये अन्नधान्याची मदत मिळवण्यासाठी जमावाची चेंगराचेंगरी होऊन 16 जणांचा मृत्यू झाला. केवळ एक-दोन किलो पिठासाठी लोक हाणामाऱ्या करत आहेत, हे चित्र भयंकर आहे. सोव्हिएत रशिया जेव्हा विस्कटला, त्यावेळी तेथेही ठिकठिकाणी पावासाठी अशाच रांगा लागलेल्या असत. भारताची अर्थव्यवस्था बरी असताना, आपल्याशी बरोबरी करू पाहणाऱ्या पाकला आता स्वतःची खरी पायरी काय आहे, ते नक्कीच कळाले असेल. 1965 नंतर अन्नधान्याची इतकी महागाई कधीही झाली नव्हती. मालवाहतुकीच्या भाड्यातच 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या परिस्थितीत पाकिस्तानला तातडीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 100 कोटी डॉलर्सच्या कर्जाची गरज आहे. हा निधी न मिळाल्यास, पाकिस्तान दिवाळखोर होईल. अशावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातून पाकला कोणीही कर्ज देणार नाही. आताच पाकमध्ये भीषण परिस्थिती असताना, दिवाळखोरीनंतर तर देशाची अन्नान्नदशा होईल हे नक्की. इस्पितळात लोकांना औषधे मिळणार नाहीत, उपासमारी व कुपोषणाने हजारोंचा मृत्यू होईल. आधीच गॅसची टंचाई असल्यामुळे लाखो गृहिणींची पंचाईत झाली आहे. रमझानच्या या महिन्यात दिवसभर लोक उपवास करतात. परंतु संध्याकाळीही खायला न मिळाल्यास, लोकांची स्थिती काय होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. कराचीत नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मातांचा मृत्यू झाला. रमझानमध्ये व्यापारी, कारखानदार व अन्य श्रीमंत व्यक्ती लोकांना फुकट अन्नाची पाकिटे वाटत असतात. ही अन्नाची पाकिटे घेण्यासाठी सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत आहे.
पाकिस्तानात आर्थिक विषमता भीषण असून, एकूण व्यवस्था सरंजामशाही स्वरूपाची आहे. अचानक ओढवलेल्या आर्थिक हलाखीमुळे असंख्य लोकांना दहा किलोच्या पिठाच्या पोत्यास हजार हजार रुपये देणे परवडत नाही. देशातील मोबाइल जुळणीचे बहुतेक कारखाने बंद पडलेले आहेत. शिवाय इतर अनेक कारखान्यांचे शटर बंद आहे. कापडगिरण्यांप्रमाणेच मोबाइल जुळणी कारखान्यांसाठी बॅंकांकडून पतपत्रे दिली जात नाही आहेत. घेतलेली रक्कम परत केली जाईल, अशी हमी देणारी ही पत्रे असतात. ती मिळाल्याशिवाय उत्पादन सुरू ठेवणे अशक्य आहे.
भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असून, एकमेकांबरोबर शांततेत राहणे जरुरीचे आहे. “आम्ही भारतासोबत तीन युद्धे लढलो आणि त्याच्या परिणामी पाकिस्तानमध्ये गरिबी व बेरोजगारीच्या समस्या तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा धडा शिकलो आहोत’, अशी कबुली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यापूर्वीच दिली आहे. “आम्हाला आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्यसुविधा व नोकऱ्या द्यायच्या आहेत. आम्ही आमची संसाधने बॉंब आणि दारूगोळ्यावर वाया घालवू शकत नाही’, असेही उद्गार त्यांनी काढले होते.
पाकिस्तानला बऱ्याच लवकर ही उपरती झाली म्हणायची! विशेष म्हणजे, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी, भारत हा शक्तिशाली देश आहे आणि अमेरिका व रशिया भारताच्या पाठीशी उभे आहेत, असे मत व्यक्त करून भारताची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानच्या डोक्यावर वेगवेगळ्या देशांचे आणि अर्थसंस्थांचे मिळून 100 अब्ज डॉलर्स एवढे कर्ज आहे. 2023 मध्येच त्यांना त्यापैकी 21 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे आणि पुढच्या तीन वर्षांत उरलेले 70 अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करावे लागेल. आज पाकिस्तानकडे केवळ 4.3 अब्ज डॉलर्स इतकीच विदेश चलनाची गंगाजळी आहे. गेल्या दहा वर्षांतील ही नीचांकी अवस्था आहे.