मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी झाली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची 11 बँक खाती गोठवली असून गुरुवारी सुमारे 1800 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे.
यावरून काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत जनमताच्या मैदानात समोर येऊन लढण्याचे आव्हान भाजपाला दिले आहे.
गल्लीबोळात क्रिकेट खेळताना एखादा चिडका आणि रडका मुलगा आपण सामना हरत असल्याचे कळताच दुसऱ्याची बॅट, स्टंप, चेंडू घेऊन जसा पळ काढतो, अगदी तशी गत भाजपची झाली आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
काँग्रेसच्या न्याय यात्रेत खंड पाडण्यासाठी भाजपने स्वतःकडची होती-नव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली, पण काँग्रेसने केवळ जनतेपर्यंत न्यायाचा संदेश पोहोचवलाच नाही, तर जनताही या लढाईत काँग्रेसच्या हातात हात देत आता सोबत उभी राहिली आहे.
ही गोष्ट भाजपाला चांगलीच ठाऊक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इलेक्टोरल बॉण्ड हा महावसूली घोटाळा उघड झाल्यानंतर भाजपावाले आणखीन घाबरले आहेत. भाजप आता बावरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
पराभव समोर दिसत असल्यामुळेच मोदी सेना प्रत्येकवेळी एजन्सींना पुढे करत विरोधकांची गळचेपी करण्याचे कुटील डाव सतत खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.