पारनेर – करोना व्हायरसचा संसर्ग टाळण्याचा उपाय म्हणून राळेणसिद्धीमध्ये विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट बंद करण्यात आली आहे. गावभेटीसाठी चौकशी करणाऱ्यांनाही तूर्त न येण्याची विनंती करण्यात येत आहे. राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजालणी आजपासून सुरू झाली.
अण्णा हजारे यांचे सध्या मौन सुरू आहे. देशभरातील महिलांवरील अत्याचारांसंबंधी उपाययोजना आणि निर्भया प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या हजारे यांच्या मौनाचा आज 81 वा दिवस आहे. यानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आणि एरवीही गावात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. दररोज सुमारे 300 ते 500 लोक राळेगणसिद्धीला भेट देतात. त्यातील अनेक जण देशाच्या विविध राज्यांतून आलेले असतात.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीमध्येही दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला हजारे यांनीही संमती दिली आहे. त्यामुळे गावात येणाऱ्यांना आता हजारे यांना भेटता येणार नाही. हजारे यांच्यासोबत हस्तांदोलन, सेल्फी, फोटोही बंद करण्यात आले आहेत. याशिवाय राळेगणसिद्धीच्या शाळेतील वसतीगृहात सुमारे 300 विद्यार्थी राहत आहेत.
ते राज्याच्या विविध भागातून आलेले आहेत. त्यांच्या पालकांनाही येथे येऊन आपल्या मुलांना भेटू नये, तसेच पुढील महिनाभर कोणत्याही विद्यार्थ्याला बाहेरगावी जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.