वानवडी, दि.25 (प्रतिनिधी) – फातिमानगर चौकात वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना पुणे-सोलापूर महामार्गा ओलांडणे अवघड झालेले असताना येथील भुयारी मार्ग बंद तसेच त्याची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त “प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात आल्याने प्रशासनाने याची तातडीने दखल घेत भुयारी मार्गाची दोन्ही बाजूने स्वच्छता सुरू केली आहे. या भुयारी मार्गामधील राडारोडा कचरा काढून स्वच्छ करण्यात येत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर फातीमानगर चौकाजवळील भुयारीमार्ग बंद असल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. पादचाऱ्यांना मुख्यरस्ता धोका पत्करून ओलांडावा लागत होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने पादचाऱ्यांना वाहनाची धडक बसून अपघाताचे प्रमाण वाढले होते. परंतु, भुयारीमार्ग बंद असल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. रात्रीच्यावेळी रस्ता ओलांडणे अश्यकच बाब होऊन बसली होती. त्यामुळे यामार्गावरील भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. याकरिता महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्चही केले. परंतु, या भुयारी मार्गात कचरा टाकला जात होता. याबाबत “प्रभात’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्रासनाने भुयारी मार्ग दोन्ही बाजूने स्वच्छ करण्याचे काम होती घेतली असून मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.