वाई – वाई शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेकांना कुत्र्यांनी चावे घेतल्याचे प्रकार समोर येत आहेत. कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे दुचाकी वाहनांचे अपघात वाढत आहेत.
शहरातील गंगपुरी, मधली आळी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रविवार पेठ, पंचायत समिती परिसर, फुलेनगरातील उताराच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कचराकुंड्या, मांस विक्रीची दुकाने, मंदिर परिसर, शाळांची मैदाने, गृहनिर्माण सोसायट्यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणांचा ताबा भटक्या कुत्र्यांनी घेतल्याने नागरिक आणि शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील नागरिक हृषिकेश भूतकर हे आपल्या लहान मुलाला शाळेत सोडायला शनिवारी सकाळी जात असताना, तुपे किराणा ते सरकारी दवाखाना या दरम्यान, त्यांच्या दुचाकीचा पाच ते सहा कुत्र्यांनी पाठलाग केला. त्यांचा मुलगा गाडीवर मागे बसला होता. कुत्र्यांनी त्यांच्या गाडीला दोन्ही बाजूंनी घेरले आणि त्यांच्या पायाचा जावा घेतला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नव्हती. या गडबडीत त्यांचा मोबाइल रस्त्यावर पडला. मुलाला काही होऊ नये, म्हणून, तेथे न थांबता भूतकर यांनी गाडी जोरात पुढे नेली.
गेल्या काही दिवसांत कुत्र्यांनी अनेक नागरिकांचे चावे घेतल्याने भीती पसरली आहे. ही कुत्री दुचाकीचालकांच्या अंगावर धावून जात असल्याने अपघात होण्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत. शहरातील अनेक नागरिक पहाटे आणि रात्री जेवल्यानंतर फिरायला जातात. त्यांच्यमध्येही कुत्र्यांची दहशत आहे. एकट्याने फिरायला बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रस्त्याने जाणार्या लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यांच्या भीतीने मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. रात्री-अपरात्री रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून, यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून, त्यांना सोडून दिला. मात्र, शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून, निर्जनस्थळी सोडण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.