मुंबई – कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. कर्नाटकात कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने सीमावर्ती गावे तहानलेली आहेत. त्यामुळेच कर्नाटकला पाण्यासाठी महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कोयना धरणातील अतिरिक्त तीन टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्याची विनंती केली आहे.
मार्च 2023 पासून उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोयना धरणातून ‘तीन टीएमसी’ पाणी कृष्णा नदीत आणि उजनी धरणातून ‘तीन टीएमसी’ पाणी भीमा नदीत सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारकडे करण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये प्रखर उष्णतेचा उल्लेख केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, “उत्तर कर्नाटकातील बेळगावी, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर या जिल्ह्यांमध्ये मार्च 2023 पासून कडक उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. येथील लोकांना घरगुती वापरासाठी पाण्याची गरज आहे.” उत्तर कर्नाटकात अद्याप मान्सून सुरू झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राने तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.