पुणे – “महाराष्ट्राच्या संत परंपरेवर गेली दोन वर्षे सातत्याने अन्याय होत आहे. दोन महिन्यांपासून पायी वारीची मागणी करणाऱ्या वारकऱ्यांना सरकारकडून दुष्टपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही,’ अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी केली.
परिषदेतर्फे गुरुवारी (दि.15) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री विजय देशपांडे, देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे, धर्मयात्रा महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. भानुदासमहाराज तुपे, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. धर्मराजमहाराज हांडे, विभाग मंत्री तुषार कुलकर्णी उपस्थित होते.
गायकर म्हणाले, “वारकऱ्यांनी नेहमीच सरकारला साथ दिली.
करोनाकाळात आश्रम उघडी केली, हजारो नागरिकांना भोजन व्यवस्था उपलब्ध केली. मात्र, सरकार सातत्याने वारकऱ्यांना हीन वागणूक देत आहे. वारकऱ्यांवर अन्यायाचे सत्र सुरू ठेवत त्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी बंदी घालणाऱ्या सरकारलाच लस देण्याची गरज निर्माण झाली आहे.’
सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा लवकरात लवकर निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात तीव्र महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा इशारा परिषदेने दिला आहे. तसेच 17 जुलै रोजी जिल्हाधिकारी, शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. लाक्षणिक उपोषण, आंदोलन, कीर्तन-भजन असा साखळी पद्धतीने कार्यक्रम होणार आहे.
वारकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत
राज्य सरकारने ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अज्ञात ठिकाणी बंदी केले आहे, तर इतरही अनेक वारकऱ्यांना नजरकैदेत ठेवले आहे. वारकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांना सन्मानाने मुक्त करावे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची माफी मागावी, अशी मागणीदेखील परिषदेतर्फे करण्यात आली.