नवी दिल्ली – स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांची गच्छंती होणारच असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, जे काही घडले त्यावर शर्मा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
एका वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तसेच संघातील प्रमुख खेळाडूंबाबतही काही सनसनाटी खुलासे केले होते. यानंतर शर्मा चांगलेच अडचणीत आले असून त्यांना पद गमवावे लागणार आहे. मात्र, हा निर्णय होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे. त्यासाठी शर्मा यांच्यावरच ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
वादग्रस्त वक्तव्यांवर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी व सचिव जय शहा यांनी नाराजी व्यक्त केली असून यापुढे कोणत्याही पदाधिकाऱ्याने थेट माध्यमांशी संपर्क करू नये तसेच कोणत्याही बाबतीत बीसीसीआयच्या परवानगीशिवाय मत व्यक्त करू नये, असेही आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.
#INDvAUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांचा बीसीसीआयवर आरोप, म्हणे “खेळपट्टीचे फोटो… “
शर्मांच्या या स्टिंग ऑपरेशनकडे बीसीसीआय एक लूज टॉक म्हणून पाहात असून कारवाई करण्यात आली तरीही केवळ त्यांना पदावरून बाजूला काढले जाणार असून अन्य कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही सांगितले जात आहे.