नवी दिल्ली – रामसेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सहमती दर्शवली आहे.
ही जनहित याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली की या मुद्द्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जनहित याचिका आता सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी 19 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले होते की, रामसेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार विचार करत असल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने केंद्राला या मुद्द्यावर निर्णय घेण्यास सांगितले. तसेच स्वामी यांचे समाधान न झाल्यास ते पुन्हा अर्ज करू शकतात, असे निर्देश दिले होते.