नवी दिल्ली – खेळपट्टीवरून सुरू झालेले कवित्व अद्याप संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता बीसीसीआय दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीचे फोटोही काढू देत नसल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे. अर्थात हे वृत्त बीसीसीआयने फेटाळले आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी येथे उद्यापासून सुरू होत आहे. नागपूरला झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 132 धावांनी गमावल्यानंतर त्यांची ही रडारड सुरू झाली.
नागपूरची खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी आदर्श नव्हती असे आरोप करून झाले. बीसीसीआयवर फसवणुकीचेही आरोप या मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी झाले. आता दिल्लीच्या खेळपट्टीचे फोटो काढण्यास बीसीसीआयने मनाई केल्याचे आरोप होत आहेत.
दुसऱ्या सामन्यासाठी अरुण जेटली स्टेडियमचे क्युरेटर ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांच्या खेळपट्टीचे फोटो घेण्यास बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ग्राऊंड स्टाफने ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना खेळपट्टीजवळ जाण्यापासूनही मज्जाव केला आहे, असेही आरोप आता केले जात आहेत.
#INDvAUS 2nd Test : दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार
दरम्यान, दिल्लीच्या या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी पहिले दोन दिवस फलंदाजांसाठी तर नंतरचे तीनही दिवस फिरकी गोलंदाजांसाठी लाभदायक ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.