नवी दिल्ली – तीन खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या विरोधात “एनआयए’ने आरोपपत्र दाखल केले आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी या दहशतवाद्यांकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतातील हस्तकांच्या माध्यमातून निधी संकलन केले जात होते, असे “एनआयए’ने आपल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.
विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या या आरोपपत्रामध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान टायगर्स फोर्स या संघटनांशी संबंधित अन्य सहा जणांच्या नावांची नावेही घेण्यात आली आहेत, असे “एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले. फरारी असलेल्या अन्य 16 जणांचा शोध घेतला जात असून बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान टायगर्स फोर्सशी संबंधित आरोपीला अटक केली गेली आहे, असेही “एनआयए’ने म्हटले आहे.
बब्बर खालसाशी संबंधित हरविंदरसिंग संधू ऊर्फ “रिंडा’ आणि लखबीरसिंग संधू ऊर्फ “लांडा’ आणि खलिस्तान टागर्स फोर्सशी संबंधित असलेल्या अर्सदीपसिंग ऊर्फ “अर्श दाला’ हे तिघे जण कुख्यात गॅंगस्टर, दहशतवादी आणि ड्रग स्मगलर आहेत. देशाबाहेर राहून त्यांनी भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठीचे नेटवर्क उभे केले आहे.
या नेटवर्कच्या माध्यमातून ते दहशतवाद्यांची भरती, त्यांना प्रेरणा देणे आणि भारतातील हस्तकांना हाताळण्याचे काम करत असतात. त्यांच्या कारवायांमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून ड्रग्ज, शस्त्रांची तस्करीचाही समावेश असतो. उत्तर भारतातील कुख्यात गॅंगशीही त्यांचे संबंध आहेत, असेही “एनआयए’च्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
तीन कुख्यात दहशतवादी…
रिंडा हा पाकिस्तानातून सक्रिय असून “आयएसआय’च्या संरक्षणाखाली तो तेथून दहशतवादी कारवाया हाताळत असतो. महाराष्ट्र आणि पंजाबमधील हत्या, खंडणीसारख्या गुन्ह्यांमागील तो सूत्रधार आहे. गेल्या वर्षी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावरील हल्ल्यामागेही त्याचा हात होता. लांडा आणि दाला यांच्यासह त्यालाही दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दाला हा मूळचा पंजाबमधील रहिवासी असून, नंतर तो कॅनडाला गेला आणि हरदीपसिंग निज्जरच्या संपर्कात आला. या दोघांनी मिळून खलिस्तान टायगर्स फोर्ससाठी खंडण्या मिळवायला आणि त्यासाठी पंजाबमधील नेते, उद्योजकांना लक्ष्य करायला सुरुवात केली. लांडा हादेखील टोळीतून बनलेला गुन्हेगार असून, कॅनडात गेल्यावर रिंडाच्या संपर्कात आला होता, असेही या प्रवक्त्याने सांगितले.