श्रीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपूरच्या परिस्थितीवर बोलले पाहिजे आणि विरोधकांनाही या विषयावर आपले मत मांडण्याची परवानगी दिली पाहिजे, असे प्रतिपादन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
ते म्हणाले की आज संपूर्ण जग मणिपुरबद्दल बोलत आहे. त्यामुळे मोदींनी आता संसदेत बोलले पाहिजे. ते बोलल्यानंतर त्यांनी आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे. आम्हाला आशा आहे की आम्हाला या विषयावर संसदेत बोलण्याची परवानगी मिळेल. आमचा उद्देश टीका करणे नसून परिस्थितीबद्दल आमच्या भावना व्यक्त करणे हा आहे, असे अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले.
मणिपूरमध्ये दोन कुकी महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या व्हायरल व्हिडिओवर मत विचारले असता अब्दुल्ला म्हणाले, मणिपूरमधील ही घटना आपल्या सर्वांसाठी शोकांतिका आहे. काही लोक केवळ सत्तेसाठी द्वेष पसरवत आहे. मला अशा शक्तीचा तिरस्कार वाटतो, ज्यासाठी त्यांना आपल्या लोकांमध्ये फूट पाडावी लागते, असे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.